इलहान ओमर या अमेरिकी कॉँग्रेसवूमन! म्हणजे अमेरिकेतल्या एक राजकारणी...! त्या मिनेसोटा या अमेरिकेतल्या प्रांताचं प्रतिनिधित्व करतात. त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या आहेत. ओमर या अमेरिकी कॉँग्रेसमधल्या पहिल्या सोमाली -अमेरिकन महिला राजकारणी आहेत आणि पहिल्या मुस्लिम महिला राजकारणी आहेत. त्यांच्याबद्दल आज बोलायचं कारण काय? असा प्रश्न सहाजिकच विचारला जाऊ शकतो. त्याचं कारण पण विशेष आहे. या ओमर बाईनी अमेरिकी हाऊस ऑफ रिप्रेजेन्टटेटीव्ह मध्ये भारताविरुद्ध ठराव मांडला आहे. काय आहे हा ठराव? ओमर यांचं म्हणण आहे की भारतामध्ये सतत आणि सारख मानवी हक्कांचं उल्लंघन होतं आहे. त्यांच्या मते भारतातल्या मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, दलित तसंच आदिवासी आणि इतर अल्पसंख्याक समाजामधल्या लोकांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे. हा ठराव ओमर यांनी अमेरिकी कॉँग्रेसवूमेन रशिदा तालिब आणि युआन वर्गा यांच्या मदतीने हाऊसमध्ये मांडला आहे.
ओमर
यांनी भारताला “कंट्री ऑफ पर्टीक्युलर कन्सर्न” या इतर देशांच्या यादीमध्ये
समाविष्ट करण्यासाठी हा ठराव मांडला आहे. याचा अर्थ काय? हे जाणून घेण्यासाठी
“कंट्री ऑफ पर्टीक्युलर कन्सर्न” हा काय प्रकार आहे हे जाणून घेऊयात! कंट्री ऑफ
पर्टीक्युलर कन्सर्न म्हणजे अमेरिकी राष्ट्रपतीच्या अधिकृत अधिकाराअंतर्गत,
अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवाने, ज्या देशाने ‘इंटरनॅशनल रीलीजियस फ्रीडम अॅक्ट’ या
कायद्यानुसार ज्या देशाने अल्पसंख्याक समाजाच्या मानवी हक्कांचं उल्लंघन केलं आहे अश्या
देशाला कंट्री ऑफ पर्टीक्युलर कन्सर्न या वर्गवारीत समावेश करण्याचा अधिकार
प्राप्त होतो. अल्पसंख्याक समाजाच्या मानवी हक्कांचं उल्लंघन म्हणजे त्यामध्ये
टॉर्चर, अमानविय शिक्षा, विचार न करता डांबून ठेवणे, लोकाना अक्षरशः गायब करणे
म्हणजे किडण्याप करून नाहीस करणे इत्यादि गोष्टी ज्या देशात होत असतील त्या देशावर
आर्थिक निर्बंध लादण्याचा अधिकार अमेरिकेला प्राप्त होतो. अर्थात इथे हे नमूद
करायला पाहिजे की अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवाना हा ठराव मानणं आणि त्यानुसार
कारवाई करणं बंधनकारक नाही.
भारताचा
या अश्या प्रकारच्या देशांच्या यादीत समावेश करावा जेणेकरून भारतावर निर्बंध लादता
येतील असा विचार या ठरावामागे आहे हे स्पष्ट आहे. या यादीतले इतर देश म्हणजे
कोमोरोस, क्युबा, निकारागवा आणि रशिया हे आहेत. या प्रकारच्या ठरावामद्धे असा
उल्लेख आहे की भारताचा सलग तीन वर्ष या कंट्री ऑफ पर्टीक्युलर कन्सर्न यादीत
समावेश करावा आणि भारतावर निर्बंध लादावेत. हा ठराव अमेरिकेच्या फॉरिन अफेअर्स कमिटीकडे
पाठवण्यात आला आहे. त्यावर काय तो निर्णय होईल. आता थोडं ओमर यांच्याविषयी
बोलूयात.
इलहान
ओमर आणि वादविवाद हे समीकरणच आहे. ओमर यांचा जन्म आफ्रिकेतल्या सोमालिया देशातल्या
मोगादीशू इथला. वडील सोमाली सैन्य दलात होते. ओमर यांच्या आईंचं निधन इलहान २
वर्षाच्या असताना झालं. इलहान यांना मग त्यांच्या आजोबानी आणि वडीलानी सांभाळलं.
सोमालियात गृहयुद्ध सुरू झाल्यानंतर तिथून ओमर कुटुंबाने सोमालीया सोडून अमेरिकेत आश्रय
घेतला. हे साल होतं १९९५! पुढे शिक्षण,
आणि राजकारणातला प्रवेश असा त्यांचा सगळा प्रवास या दरम्यान झाला. इलहान यांचे
आजोबा अमेरिकेत कधी कधी राजकीय सभांना जायचे तेंव्हा इलहान या त्यांच्यासोबत
जायच्या... ! इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला चालना मिळाली असं आपण म्हणू शकतो.
इलहान
ओमर आणि वादविवाद हे समीकरण आहे हे म्हणण्यामागे ठोस स्वरूपात तश्या गोष्टी घडल्या
आहेत. ओमर यांनी सौदी अरेबिया तसंच चीन मधल्या अल्पसंख्याक समाजाच्या बाजूने
बोलताना मानवी हक्कांचं या दोन देशांकडून उल्लंघन होत आहे असे आरोप केले. त्यांनी
सिरियातल्या आसाद रेजीम (सरकार) वर टीका केली. त्यानी ट्रंप यांच्यावर टीका केली
आणि इराणच्या बाजूने बोलताना मत व्यक्त केलं, थोडक्यात इराणच्या राजकीय भूमिकेला
पाठिंबा दिला. हे झालं मानवी हक्कांविषयी. ओमर यानी इजराईलच्या पॅलेस्टाईन धोरणावर
वेळोवेळी टीका केली आहे. त्यांचा अमेरिकेतल्या ज्यू लॉबीला विरोध आहे आणि एकूणच
इस्राइलला विरोध आहे. तसंच LGBTQ
समाजाला त्यांनी पाठिंबा दिलं आहे, मग ते पॅलेस्टाईन गट का असेना. अमेरिकेच्या
परराष्ट्र धोरणावर कडाडून टीकासुद्धा त्यांनी केली आहे. त्यांच्या मते अमेरिकेला
इतके मिलिटरी बेसेस ते पण जगात सगळीकडे असण्याचा काय उपयोग आहे... कर भरणाऱ्यांचा
पैसा हा मिलिटरीसाठी वापरला जातो, म्हणून इलहान यांनी या अमेरिकेच्या सैनिकी
धोरणावर टीका केली आहे.
हे
सगळं एका बाजूला ठेवून ओमर यांच्या भारताविषयी भूमिका पाहुयात... ! जेंव्हा
जेंव्हा भारताबद्दल अमेरिकेत कॉँग्रेशनल हिअरिंग चा मुद्दा उपस्थित झाला तेंव्हा
तेंव्हा इलहान ओमर यांनी भारताच्या धोरणबद्दल निषेध नोंदवला तसंच खोचकपणे
भारताविरुद्ध भूमिका घेतली. हे त्यांचे पूर्वग्रहदूषित म्हणजे बायस मत होते. भारत
पाकिस्तान मुद्द्यावर ओमर यांनी सतत पाकिस्तानची बाजू उचलून धरली. पाकिस्तानच्या मानवी
हक्क धोरणांबद्दल का ओमर बोलल्या नाहीत? का पाकिस्तान मध्ये अल्पसंख्याक समाजाच्या
बाजूने भूमिका घेतली नाही... ? जसे भारतामध्ये अल्पसंख्याक आहेत तसेच
पाकिस्तानमध्येही आहेत मग भारताला वेगळी ट्रीटमेंट आणि पाकिस्तानला वेगळी
ट्रीटमेंट अशी भूमिका का... ? हे अनाकलनीय आहे. बरं कहर म्हणजे एप्रिल महिन्यात
ओमर बाई पाकव्याप्त काश्मीरला भेट देऊन आल्या आणि भारताविरुद्ध गरळ ओकली. भारताने
त्यांच्या या भेटीबद्दल कडक शब्दात निषेध नोंदवला आणि याबद्दल आक्षेप सुद्धा घेतला
आहे.
इलहान
ओमर यांचं द्वेषाचं राजकारण यातून दिसून येत. एकीकडे मानवी हक्कांबद्दल सजग
असणाऱ्या ओमर दुसरीकडे मानवी हक्क डावलले जात आहेत अश्या पाकिस्तानबद्दल गप्प
तसंच, भारतालाच यावर सुनवणे आणि सतत भारताविरुद्ध भूमिका घेणे हे कितपत योग्य आहे
हे त्यांनीच ठरवावे. शेवटी सांगायचं म्हणजे भारताला नामोहरम करणे ही भूमिका सोडून
उघड्या डोळ्यांनी जर ओमर यांनी पाहिलं तर त्यांची भूमिका ही कशी पूर्वग्रहदूषित
आहे हे त्यांच्याच लक्षात येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची भूमिका ही
अमेरिकेची भूमिका नाही. असं जरी असलं तरी भारत – अमेरिका संबंध मजबूत होत असताना भारताबद्दल
अश्या प्रकारच्या पूर्वग्रहदूषित मत व्यक्त करणाऱ्या अमेरिकी राजकारण्यांच्या
भूमिकेवर अमेरिकी प्रशासनाने लक्ष घालावं.
-निखिल कासखेडीकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा