मुख्य सामग्रीवर वगळा

हवामान बदल आणि माणूस प्राण्याची झोप!

 हवामान बदल हा सध्याच्या घडीचा मानवी आयुष्यातला एक सगळ्यात ज्यास्त चर्चिला जाणारा विषय झाला आहे. मागच्या काही दशकांपर्यन्त हवामान बदलाबद्दल इतकी जागरूकता नव्हती जितकी आज आहे. हवामान बदल, जागतिक तापमान वाढ, ओला व कोरडा दुष्काळ, हिमछादीत प्रदेशातला बर्फ वितळणे, अंटाऱ्टिका आणि आर्टिक भागातले ग्लेशीयर्स वितळणे, समुद्राची पातळी वाढणे, पुर येणे, अवकाळी पाऊस येणे अश्या एक ना अनेक बाबी जगभरात घडू लागल्या आहेत. हवामान बदलाचा थेट परिणाम तर आता मानवी जीवनावर होणार आहे. थेट बोलायचं झाल्यास हवामान बदलामुळे माणसांच्या जीवन पद्धतीवरच याचा परिणाम होणार आहे. मनुष्य प्राण्याची झोप यामुळे कमी होणार आहे.

कोपनहेगन विद्यापीठातल्या केलटन मायनर यांनी या संदर्भात ६८ देशांमधल्या ४८,००० लोकांच्या झोप घेण्याबद्दलचा अभ्यास केला. यासाठी त्यांनी त्या व्यक्तींच्या हातावर म्हणजे रिस्टबँड बांधून त्याच्या झोपेबद्दल ची माहिती ट्रॅक करून, त्यानुसार निष्कर्ष काढले आहेत. आणि हे निष्कर्ष चक्रावून टाकणारे आहेत. त्यांच्या अभ्यासानुसार २०९९ पर्यन्त एका साधारण व्यक्तीची झोप ही दर वर्षी ५० ते ५८ तास इतकी कमी होईल. म्हणजे दर रात्रीचा हिशोब केला तर दर रात्री १० मिनिटे या या वेगाने माणसांची झोप कमी होत जाईल. म्हणजे हवामान बदलामुळे माणसांची झोप दिवसेंदिवस कमी कमी होत जाईल. अजून एक अचंबित करणारं निरीक्षण म्हणजे जे लोक विकसनशील देशांमध्ये राहतात त्यांच्यावर हवामान बदलामुळे प्रतिकूल परिणाम होईल आणि त्यांच्या झोपेवर इतर विकसित देशांमधल्या लोकांच्या झोपेपेक्षा ज्यास्त परिणाम होईल.

भविष्यामध्ये साधारण एक प्रौढ व्यक्ति रात्री उशिरा झोपेल आणि सकाळी लवकर उठेल, म्हणजे त्याची झोप दिवसेंदिवस कमी कमी होत जाईल. तसंच ज्या दिवशी उष्ण तापमान असेल त्या दिवशी ती प्रौढ व्यक्ति कमी वेळ झोपेल. याचं वैद्यकीय कारण थक्क करणारं आहे. माणसाला झोप लागण्यासाठी त्याच्या शरीराचं कोअर टेंपरेचर हे कमी व्हावं लागतं. पण ज्या दिवशी वातावरणातलं तापमान ज्यास्त असेल त्या दिवशी ज्यास्त तापमानामुळे शरीरातलं कोअर टेंपरेचर कमी होणार नाही आणि याचा थेट परिणाम होऊन झोप कमी कमी होत जाईल. ‘वन अर्थ’ या नियतकालीकामध्ये वरील निरीक्षण मायनर यांनी मांडले आहेत.  

 

यातलं अजून एक महत्वाचं निरीक्षण म्हणजे वेगवेगळे ऋतु, लोकसंख्या आणि वेगवेगळ्या प्रदेशातलं हवामान याचा परिणाम होऊन त्याची परिणीती कमी झोप लागण्यामध्ये होईल. हवामान बदलामुळे तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरसुद्धा परिणाम होईल.

हवामान बदलामुळे बाकी घटकांवरसुद्धा परिणाम होणार आहे. दक्षिण आशियामध्ये मान्सूनचा पाऊस ज्या प्रमाणात पडत होता त्याची वारंवारिता बदलत चालली आहे किंवा कमी होत चालली आहे. म्हणजे समसमान प्रमाणात पाऊस पडत नाहीच. तापमान वाढीमुळे जर हिमालय वितळला, तर त्यातून उगम पावणाऱ्या नद्याना पुर येतील आणि यामुळे समुद्राची पातळी वाढेल, तसंच ओला दुष्काळ पडेल. कदाचित दुसऱ्या भागात तर कोरडा दुष्काळ पडेल, पाण्यासाठी वणवण फिरावं लागेल. म्हणजे एकीकडे पुर तर दुसरीकडे पाणीच नाही, असे महाभयंकर परिणाम उद्भवतील आणि खरंच ही विचार करायला लावणारी बाब आहे. या शतकाच्या शेवटापर्यंत पृथ्वीचं तापमान हे २ डिग्री सेल्सिअस ते ६ डिग्री सेल्सिअस इतकं वाढण्याची शक्यता आहे.    

जागतिक तापमान वाढ ही खऱ्या अर्थाने सुरू झाली ती औद्योगीक क्रांतीनंतरच... याचं कारण मानवी हस्तक्षेपामुळे हरित वायु उत्सर्जनाचं प्रमाण प्रचंड वाढलं. १९५० नंतर ते अधिक प्रमाणात वाढू लागलं. उद्योगधंद्याना, कारखान्याना काम करण्यासाठी ऊर्जेची गरज भासली. त्यामुळे कोळसा आणि तेल या दोन ऊर्जा साधनाची गरज मोठ्या प्रमाणात वाढू लागली. शिवाय वाहन उद्योगांच्या भरभराटीमुळे अतिरिक्त ताण संसाधनांवर पडू लागला. हे तेल नावाचं शस्त्र वापरुन आखाती देशांनी तर याचा पुरेपूर फायदा घेतला. महासत्ता असणाऱ्या अमेरिकेने तर आखाती देशांकडून तेल विकत घेण्यापेक्षा आपण स्वतःच तेल उत्पादन करुयात असं ठरवलं आणि आज अमेरिका सौदी अरेबियाला मागे टाकून जगात पहिल्या क्रमांकाचा तेल उत्पादक देश बनला आहे.

मूळ मुद्यावर यायचं झाल्यास हवामान बदल आणि माणूस प्राण्याची झोप यांचामद्धे नक्की काय संबंध आहे हे वरील विवेचनावरून लक्षात येईल... म्हणूनच आताच मानव प्रजातीला झोपेतून जागं होण्यासाठी ही योग्य वेळ आहे अन्यथा आपण विनाशाकडे चाललो आहोत हे आता आपल्याला लक्षात आलं असेल. गंभीर होऊन मानवाने शाश्वत उर्जेचा ध्यास घेऊन मार्गक्रमण केलं तर कुठे सकारात्मक बदल घडून हवामान बदलाचा प्रश्न आणि त्याचे परिणाम याचा दाह कमी होईल.

सुधारण्यासाठी हीच ती वेळ आणि हाच तो क्षण आहे, मानवाने यावर विचार करावा आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे कृती करावी.

 

निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...

अमेरिकेत जवळपास ५० वर्षानंतर झाली UFO संदर्भात बैठक!

  अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात... म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO ... म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तु! अश्या वस्तु ज्याचं मूळ बाहेरचं आहे असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं. अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अश्या विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP , म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यन्त जवळपास १४० अश्या केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलटसन...

फार्क (FARC) रुपी तलवार म्यान !

कोलंबिया म्हणजे जगविख्यात लेखक नोबेल विजेते गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांची भूमी! जशी ही थोर साहित्यिकांची, लेखकांची भूमी तशीच ही Farc (रिव्हॉलुशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या डाव्या क्रांतिकारी संघटनेची पण आद्य भूमी. या क्रांतिकारी गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गट काही डाव्या क्रांतिकारी विचारवंतांचा गट नाही. स्थापनेपासूनच या गटात विचारवंत नाही तर सामान्य गरीब शेतकरी सामील झालेले होते. या गटाची निर्मिती साम्राज्यवादाला विरोध आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे महत्व आणि वर्चस्व मान्य असणे या दोन मुलभूत घटकांवर झाली. साधारणतः अनेक डाव्या क्रांतिकारी चळवळी आणि गटांप्रामाणे या Farc चाही भर स्वतःची सैनिकी फौज असण्यामध्ये होता. १९६४ पासून हा गट कार्यरत झाला. पण दुर्भाग्य म्हणजे या गटाची मदार ही अपहरण करणे आणि खंडणी मिळवणे तसेच ड्रग्सचे स्मगलिंग करणे यांवर होती. पण नुकत्याच कोलंबियन सरकार आणि Farc नेत्यांमध्ये झालेल्या करारामुळे साधारणतः ५० वर्षे चाललेला सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अजून सार्वमत घेऊन ह्या कराराला अंतिम मान्यता मिळणे बाकी आह...