मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत, तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की, खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे? बरं अपराधी अपराध करून पळून जातो, मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे, पण मग त्यांना तपासासाठी, चौकशीसाठी, कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ !
जेंव्हा
एका देशातून गुन्हेगार दुसर्या देशात पळून जातो, तेंव्हा त्याला पकडणं हे केवळ अशक्य होऊन जातं. याचं कारण कुठल्याही
देशाची एक न्याय व्यवस्था असते. काही कायदे असतात. देशांतर्गत जर आरोपी फरार झाला
असेल तर त्याला इतर राज्यातल्या तपास यंत्रणांकडून शोधून अटक केली जाऊ शकते. पण
आरोपी जर देश सोडून दुसर्या देशात गेला तर तो विषय आंतरराष्ट्रीय होतो आणि मग इथे
दोन देशांमधल्या कायदेशीर बाबींचा संबंध येतो. उदाहरणार्थ विजय मल्ल्या... विजय मल्ल्या
इथून भारतातून गुन्हा करून पळून जाऊन त्याने लंडन गाठलं. तर अश्या परिस्थितीत भारत
आणि ब्रिटन यांच्यामध्ये प्रत्यार्पण करार
झाला असेल तर आणि तरच मल्ल्यावर कारवाईसाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. प्रत्यार्पण
करार म्हणजे, कुठल्या आरोपीने भारतात गुन्हा केला आणि तो
ब्रिटनला पळाला तर, जर दोन देशांमध्ये म्हणजे या उदाहरणार्थ भारत
आणि ब्रिटनमध्ये प्रत्यर्पण करार झाला असेल तरच आधी ब्रिटनमध्ये त्याची माहिती भारतीय
अधिकार्यानी देऊन मग पुढे ब्रिटनमध्ये खटला दाखल केला जाऊ शकतो आणि मग भारतात
त्या व्यक्तीवर खटला दाखल केला जाऊ शकतो. प्रत्यार्पण करार म्हणजे दोन देशांमध्ये
झालेला एकमेकांच्या आरोपींचं आदानप्रदान करण्यासाठी केलेला करार.
भारत
आणि ब्रिटन मध्ये १९९३ साली असा प्रत्यार्पण करार झाला आहे. त्याआधी भारतात गुन्हा
केलेल्या भारतीय आरोपींना आणि त्यांनी पुढे जाऊन ब्रिटन मध्ये आसरा घेतला आहे
अश्या आरोपींना भारतात आणण्यासाठी केलेली कायदेशीर योजना अस्तीत्वात नव्हती.
खरं
म्हणजे आरोपी परदेशात पळून गेल्यानंतरच आपल्याला समजतं की आरोपीने गुन्हा केलेला
आहे आणि तो परदेशात पळून गेला आहे, आणि मग सगळी प्रक्रिया चालू होते गुन्हेगाराला पकडण्याची... अश्या वेळेस, बरं प्रकरण इथपर्यंत थांबत नाही. दोन्ही देशांच्या परराष्ट्र
मंत्रालयांचाही इथे सहभाग असतो. सुरवातीला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाला ब्रिटनच्या
परराष्ट्र मंत्रालयाला आरोपीबद्दल कागदपत्रे, पुरावे असं
सगळं पाठवाव लागतं. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाला पटलं की ती व्यक्ति खरच
आरोपी आहे आणि तिने गुन्हा केला आहे तर अश्या परिस्थितीत ब्रिटनमधल्या न्यायालयात
आरोपीवर खटला भरला जातो. जर ब्रिटनच्या न्यायालयात त्या आरोपीवर आरोप सिद्ध झाले
तरच भारतात त्याच्यावर इथल्या न्यायालयात खटला सुरू होतो आणि मग इथेसुद्धा आरोप
सिद्ध झाले की मग ड्युयल क्रिमीन्यालिटी कलमाअंतर्गत भारतात आरोपीला ब्रिटनमधून
आणले जाऊ शकते. ही झाली एका कलमाबद्दलची बाब... पण इथे या व्यतिरिक्तसुद्धा कलमं
आहेत. जर गुन्हा छोटा असेल तर ब्रिटनमधून आरोपीला भारतात आणले जाऊ शकत नाही. तसच
जर आरोपी म्हणाला की भारतातले तुरुंग अस्वछ असतात, तिथे
जीवाला धोका आहे किंवा तिथे टोर्चर केलं जातं, तर अश्या
परिस्थितित मानवाधिकार संघटनांकडून किंवा आयोगाकडून त्या आरोपीला ब्रिटनमधून
भारतात नेता येत नाही. मानवतावादी दृष्टीकोणातून त्या आरोपीकडे बघितलं जातं. यामध्ये
तिसरी महत्वाची बाब म्हणजे जर भारत आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये परराष्ट्र संबंध
चांगले नसतील तर त्याचाही फायदा आरोपीला मिळू शकतो आणि त्याचं भारतात जाणं रद्द
होऊ शकतं. अजून एक गम्मतीशीर मुद्दा म्हणजे जर भारतीय आरोपीने ब्रिटनमध्येच
काहीतरी मोठा, गंभीर गुन्हा केला असेल तर त्याच्यावर
ब्रिटनमध्ये खटला भरण्यात येतो, आणि मग भारतात केल्या
गेलेल्या गुन्ह्यांचा खटला मागे पडतो याचा निश्चित फायदा आरोपीला मिळतो.
बरं
मग प्रश्न उभा राहतो की ब्रिटन अश्या पद्धतीने परकीय आरोपींना सूट कशी देतो ?... तर ब्रिटनने अनेक देशांबरोबर असे करार
केले आहेत, ज्यातून पळवाटा शोधून जगभरातले आरोपी गुन्हा करून
ब्रिटनला पळून जातात... पण ब्रिटन असं करू का देतं? याचं
उत्तर आहे... अर्थातच पैसा. ब्रिटीश सरकार जगभरातून आलेल्या आर्थिक गुन्हे
केलेल्या आरोपींना आश्रय देतं आणि सांगतं तुम्ही तुमचे पैसे आमच्या देशात गुंतवा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा