ही गोष्ट आहे २३ डिसेंबर २०२१ची. उत्तर चीनमधल्या शांक्सी विभागातल्या शियान शहरात अचानक एकच धावपळ सुरू झाली. चीनी सरकारी अधिकार्यानी फरमान काढलं- शहरातल्या सर्व म्हणजे १ कोटी ३० लाख नागरिकांनी घराच्या बाहेर अजिबात पडू नये... कारण कोरोना या जीवघेण्या रोगाचा फैलाव होतो आहे... यावेळी वेळीच उपाय नाही केले तर खूप गंभीर परिणामांना सगळ्यांना सामोरे जावं लागेल...
चीनमध्ये साम्यवादी सरकार असल्यामुळे आणि चीनी
सरकारचं माध्यमांवर नियंत्रण असल्यामुळे बातमी खरी असली तरी ती कितपत खरी आहे
याबद्दल साशंकता निर्माण होऊ शकते. अर्थात आकडे बदललेले असतील पण परत कोरोना मूळ
धरू पाहतोय की काय अशी परिस्थिती आता चीनमध्ये आहे. ज्याप्रमाणे आपण सहजरीत्या
फेसबुक वापरू शकतो, आपली मतं
मांडू शकतो, विरोध करू शकतो, हरकत घेऊ
शकतो (कारण आपल्याकडे लोकशाही आहे)...
चीनमध्ये अशी परिस्थिती नाही... याचं कारण चीनला आपल्या नागरिकाना स्वातंत्र्य
मिळू द्यायचा नाही... आणि सध्याच्या शी जिनपिंग यांच्या सरकारने ती पुरेपूर
खबरदारी घेतली आहे. विषय आहे चीनमध्ये कोरोना परतण्याचा! अर्थातच चीनी सरकारला खरी
माहिती उजेडात येऊ द्यायची नाही, असाच अर्थ यातून निघतो.
गम्मत म्हणजे काही वृत्तवाहिन्या या व्हायरसला
कोरोना व्हायरस न म्हणता ‘वुहान व्हायरस’ म्हणतात. म्हणजे वुहान या शहरातून, तिथल्या
प्रयोगशाळेतून हा व्हायरस सगळ्या जगभर पसरला आणि त्याचे परिणाम सगळी मानवजात भोगते
आहे असा एक ठाम समज आहे. असो. तर विषय आहे कोरोना परतण्याचा... जसं जगभर सोशल
मीडिया म्हणून सगळीकडे फेसबुक सर्वत्र वापरलं जातं त्याप्रमाणे चीनमध्ये फेसबुक वापरलं
जात नाही याचा कारण चीनमध्ये फेसबुक या आणि इतर सगळ्या जागतिक मीडियाच्या वापरास
बंदी आहे. चीनमध्ये फेसबुकप्रमाणे वाईबो (Weibo) ही साईट स्थानिक चीनी नागरिक वापरतात॰ अर्थातच चीनी सरकारचं कडक नियंत्रण
या साइटवर आहे. वाईबोला सरकारी वेबसाइट असं म्हटलं तरीसुद्धा काही हरकत नाही अशी
परिस्थिती आहे.
मात्र तुम्ही फार काळ जनतेला वेठीस धरू शकत
नाही ही खरी गोष्ट आहे. चीनच्या शियान मधले नागरिक आता आवाज उठवू लागले आहेत असे
चित्र आहे. नागरिकांनी तिथल्या सामाजिक माध्यमांवर आपल्या कैफियती मांडल्या. काहींनी
फोटो टाकले. २३ डिसेंबर पासून सगळ्या नागरिकाना घरी बसायचे आदेश जारी केल्यामुळे त्यांची
खूपच तारांबळ उडाली आहे. लोकांकडे खायला अन्न नाही. बाहेर तर पडू शकत नाही. चीनी
अधिकार्यानी अन्नधान्याचा मोफत पुरवठा केला असून ते वाटण्यात येत आहे असं सरकारचं
म्हणणं आहे. परिस्थिती तर इतकी गंभीर आहे की लोक चक्क वस्तुविनिमय (Barter) पद्धतीने रोजचं जीवन जगत आहेत. सिगरेटच्या
बदल्यात कोबी, भांडीधुण्याच्या साबणाच्या बदल्यात सफरचंद, तर आपल्या व्हिडिओ गेमच्या बदल्यात नूडल्स असले भलतेच व्यवहार नागरिकाना
करावे लागत आहेत. म्हणजे मध्ययुगीन परिस्थिती आहे की काय अशी शंका यावी.
काही बातम्यांनुसार शियान इथल्या स्थानिक
प्रशासनाने अन्नधान्याचे संकट उभे राहू नये, तसच लोकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून अन्नधान्याचे पॅकेट्स तयार
करण्याचे आणि ते पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. जर व्यवस्था भक्कम असती तर
लोकांनी तक्रारी केल्या नसत्या... पण तसं दिसत नाही.
ओमायक्रोनचं
थैमान सुरू आहे. अशी परिस्थिती असताना चीन
सगळ्या जगाला कुठल्या दिशेने घेऊन जाणार आहे याची चीनलासुद्धा कल्पना नसावी...
यावर उपाय ? आपण आपली रोग प्रतिकारक शक्ति वाढवूयात, व्यायाम करूयात, आणि आपल्या सरकारने कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि काय करू नये हे सांगितल्यानंतर
त्याचं तंतोत्तांत पालन करुयात आणि सुरक्षित राहूयात एवढंच आपण करू शकतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा