23 मार्चला इजिप्तच्या सुएझ कालव्यात एव्हरग्रीन मरीन या तैवानच्या कंपनीचं एवर गिव्हन हे मालवाहू जहाज सुएझ कालवा पार करत असताना अडकून पडलं. ते जमिनीत रूतलं आणि ते अश्या पद्धतीने अडकून पडलं की दोन्ही बाजूनी येणार्या आणि जाणार्या मालवाहू जहाजांचा रस्ताच बंद झाला. यामुळे जलवाहतुकीवर परिणाम होऊन साधारणत: तीनशे मालवाहू जहाजं अडकून पडली आहेत. यामुळे खूप मोठं आर्थिक नुकसान जगाला झेलावं लागत आहे. तासाला 400 मिलियन डॉलर्स, तर दिवसाला 9.6 बिलियन डॉलर्स एवढं आर्थिक नुकसान होत आहे. 14 टग बोटी हे जहाज परत पाण्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, याचं कारण, ते जहाज मातीत रूतलं आहे.
काही बातम्यांनुसार यामुळे संपूर्ण जलवाहतुकीबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
याचं कारण असं आहे की, तज्ञांनी सांगितल्यानुसार
सध्याच्या काळातली मालवाहू जहाज कमी कर्मचारी वर्ग, कमी
जागेत खूप माल भरणे आणि कमी स्किल असलेला कर्मचारी वर्ग या सर्व गोष्टींमुळे जलवाहतुकीच्या
क्षेत्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘एवर गिव्हन’ या जहाजाबद्दल बोलायचं झाल्यास मालवाहू जहाजाचा कर्मचारी वर्ग हा भारतीय
आहे. हे कर्मचारी-अधिकारी मिळून 25 लोक या जहाजावर आहेत.
जहाजाच्या कंपनीनुसार हे जहाज वादळी वार्यांमुळे आणि मोठ्या लाटांमुळे भरकटत जाऊन
सुएझ कालव्यात अडकले. पण तज्ञानुसार मार्गातून जात असताना जहाजाचा वेग हा 8 नॉटिकल
माइल्स इतका असायला होता, पण प्रत्यक्ष त्याचा वेग हा 30
नॉटिकल माइल्स एवढा होता, याचं कारण कंपनीकडून सांगण्यात आलं
की मोठ्या लाटा असल्यामुळे ते अडकून पडायला नको म्हणून त्या जहाजाचा वेग वाढवण्यात
आला. याबरोबर दुसरं कारण म्हणजे तज्ञानुसार, दहा वर्षापूर्वी
10000 कंटेनर वाहून नेणारी मालवाहू जहाज होती, पण आता एव्हर
गिव्हन या जहाजाचं उदाहरण घेतल्यास यावर 20,000 कंटेनर्स
आहेत, म्हणजे 10 वर्षात या मालवाहू जहाजांची, दुप्पट माल वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यात आली. तिसरा मुद्दा हा की, या जहाजाची लांबी 400 मीटर आहे. आता एवढे अजस्त्र जहाज सुएझ कालव्यातून सहजासहजी
जाऊ शकेल का? या बद्दल सुदधा शंका उपस्थित केल्या जाऊ
लागल्या आहेत.
सुएझ कालवा अनेक कारणासाठी महत्वाचा आहे. एकूण जागतिक व्यापारापैकी 12%
व्यापार हा या जलवाहतुकीतून, कालव्यातून
होतो. तसेच एकूण जलवाहतुकीच्या व्यापारापैकी 30% जलवाहतुक व्यापार हा या
कालव्यातून होतो. हा कालवा इजिप्तच्या मालकीचा आहे. व्यापार ठप्प झाल्यामुळे ईजीप्त
सरकारला 14 मिलियन डॉलर्स एवढं नुकसान दर दिवसाला होतं आहे. सुएझ कालवा हा एकूण
193 किलोमीटर एवढ्या लांबीचा आहे. सुरवातीला एकच लेन या कालव्यात होती. आशिया आणि
युरोप खंडांना जोडणारा दुवा म्हणून या कालव्याचं महत्व आहे. याचबरोबर भूमध्य
समुद्र आणि तांबडा समुद्र या दोघांना हा सुएझ कालवा जोडण्याचं काम करतो. आशिया आणि
आफ्रिका खंडाना वेगळं करण्याचं कामसुद्धा हा कालवा करतो. या कालव्याच्या उत्तरेला
पोर्ट सैद बंदर आहे, तर दक्षिणेला पोर्ट तौफिक बंदर आहे. याचं
विशेष म्हणजे दोन्ही बाजूंना पाण्याची पातळी ही समुद्राच्या पातळी एवढी ठेवण्यात
आली आहे. या कालव्यामुळे इंधनाचा खर्च, आणि वेळेची बचत झाली
आहे. सुएझ कालव्यावर नियंत्रण हे सुएझ कॅनल कंपनीकडे आहे. ही इजिप्त सरकारची कंपनी
आहे. जहाजांच्या आकारमानांनुसार आणि प्रकारानुसार वेळोवेळी कालव्याची रुंदी आणि
खोली वाढवण्यात आली आहे. पर्शियन आखाती देशातील खनिज तेल युरोपिय देशांकडे वाहून
नेणार्या ऑइल टँकरची संख्या यात जास्त आहे. या कालव्यातून कोळसा, खनिज द्रव्ये, धातू, तेलबिया, सीमेंट, खते, तृणधान्ये आणि
यंत्रसामग्री यांची जास्त वाहतूक असते. अंदाजे दिवसाला 50 मालवाहतुक जहाजं या
कालव्यातून ये जा करतात.
इजिप्तचे सर्वेसर्वा गमाल अब्दुल नासर यांनी 1956 रोजी सुएझ कालव्याचे
राष्ट्रीयीकरण केल्यानंतर इतिहासात प्रसिद्ध असा सुएझ क्रायसिस निर्माण झाला होता.
या दरम्यान कालवा 8 वर्ष बंद करण्यात आला होता. 1975 ला परत हा कालवा सुरू करण्यात
आला. यामुळे या कालव्याला सामरीक महत्व आहे. या कालव्यात अजून एक लेन तयार करण्यात
आली जेणेकरून ट्रान्झिट टाईम वाढून यातून 100 जहाजं ये जा करू शकतील अशी योजना
करण्यात आली. 1859 साली सुएझ कालवा तयार करण्याचे काम सुरू झाले. आणि 1869 ला काम
पूर्ण झाले. हा मानवनिर्मित कालवा आहे.
परत मुद्दयाकडे यायचं म्हणजे, ‘एवर गिव्हन’ हे जहाजाच नाव आहे, हे जहाज ऑपरेट करणारी एव्हर ग्रीन मरीन ही तैवानची कंपनी आहे, तर जहाजाची मालकी, शोई किसेन या जपानी कंपनीची आहे.
हे जहाज तैवानहून निघून नेदरलँडच्या रोटरडम या बंदराकडे निघालं होतं. सुएझ कालव्यातून या जहाजाला जायचं असेल तर
एकूण 18520 किलोमीटर एवढं अंतर कापत जावं लागेल आणि यासाठी 25 दिवसाचा कालावधी
लागेल. तर याचा दुसरा पर्यायी मार्ग म्हणजे आफ्रिकेच्या दक्षिण दिशेला असणार्या ‘केप ऑफ गुड होप’ वरुन वळसा घालून मग अटलांटिक् समुद्रावरुन
जाऊन रोटरडम बंदराला पोहोचता येईल, पण यासाठी 25000 किलोमीटर
एवढं अंतर पार करावं लागेल आणि यासाठी 35 दिवस लागतील. एव्हर गिव्हन अडकल्यामुळे आता
इतर अडकलेल्या आणि खोळंबून राहिलेल्या जहाजांसाठी दोनच पर्याय शिल्लक आहेत, ते असे की अजून एव्हर गिव्हन जहाज पूर्ण बाहेर निघून वाहतूक पूर्ववत
होईपर्यंत तिथेच थांबायचं किंवा मग केप ऑफ गुड होप या पर्यायी मार्गाने आपाआपल्या
ठरलेल्या स्थळी जायचं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा