कोलंबिया म्हणजे जगविख्यात लेखक नोबेल विजेते गॅब्रिएल
गार्सिया मार्क्वेझ यांची भूमी! जशी ही थोर साहित्यिकांची, लेखकांची भूमी तशीच ही
Farc (रिव्हॉलुशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या डाव्या क्रांतिकारी संघटनेची
पण आद्य भूमी. या क्रांतिकारी गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गट काही डाव्या क्रांतिकारी
विचारवंतांचा गट नाही. स्थापनेपासूनच या गटात विचारवंत नाही तर सामान्य गरीब
शेतकरी सामील झालेले होते. या गटाची निर्मिती साम्राज्यवादाला विरोध आणि शहरी भागापेक्षा
ग्रामीण भागाचे महत्व आणि वर्चस्व मान्य असणे या दोन मुलभूत घटकांवर झाली.
साधारणतः अनेक डाव्या क्रांतिकारी चळवळी आणि गटांप्रामाणे या Farc चाही भर स्वतःची
सैनिकी फौज असण्यामध्ये होता. १९६४ पासून हा गट कार्यरत झाला. पण दुर्भाग्य म्हणजे
या गटाची मदार ही अपहरण करणे आणि खंडणी मिळवणे तसेच ड्रग्सचे स्मगलिंग करणे यांवर
होती. पण नुकत्याच कोलंबियन सरकार आणि Farc नेत्यांमध्ये झालेल्या करारामुळे साधारणतः
५० वर्षे चाललेला सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. असे म्हणण्याचे
कारण म्हणजे अजून सार्वमत घेऊन ह्या कराराला अंतिम मान्यता मिळणे बाकी आहे. पण सरकारकडचे
आणि Farc चे नेते यांनी करार करून या दृष्टीने पाऊल टाकले हीच मुळी विशेष गोष्ट
आहे. चार वर्षे चालेल्या खलबतींचे, चर्चेच्या अनेक फे-यांचे हे यश आहे. कोलंबियन
सरकार आणि Farc अश्या दोन्ही गटांना आता तरी कोलंबियात शांतता नांदेल अशी आशा आहे
आणि ही काळाची गरज पण आहे. कारण सरकारमध्ये आणि Farc मध्ये पाच दशकांपेक्षा
अधिक काळ रक्तपातरुपी संघर्ष चालणे हे काही सुदृढ समाजाचे लक्षण नव्हे.
या अनुषंगाने सगळ्या डाव्या चळवळी या क्रांतिकारकारकच
का असाव्या लागतात हा प्रश्न इथे पडतो आणि वैचारिक लढाई लढण्याऐवजी खंडणी, ड्रग्सचा
अनैतिक व्यापार आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे सार्वभौम आणि संवैधानिक राज्यसत्तेला
विरोध या विसंगतीत डावे क्रांतिकारक धन्यता मानतात. पण त्यांना जी क्रांती करायची
असते ती करून शेवटी त्यांना राज्यच करायचे असते, स्वतःचे कायदे आणायचे असतात, समानतेने
चालणारा समाज हवा असतो, मग हि सैनिकरूपी क्रांती कश्यासाठी? वैचारिक लढाई का नाही?
असे अनेक न कळणारे प्रश्न पडतात.
मूळ मुद्याकडे यायचे म्हणजे हॅवाना, क्युबा इथे
झालेल्या या कराराच्यावेळी स्वतः रौउल कॅस्ट्रो जातीने हजर होते. तसेच विविध लॅटिन
अमेरिकन देशांचे प्रतिनिधीसुद्धा हजर होते आणि संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की
मुन उपस्थित होते. विशेष म्हणजे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी चर्चेच्या
फेऱ्यांवेळी दोन्ही बाजूंकडच्या नेत्यांना भेटले. रौउल कॅस्ट्रो जातीने हजार होते
असे नमूद करण्याचे कारण म्हणजे जेष्ठ डावे क्रांतिकारक आणि सगळ्या डाव्या मंडळींचे
मसीहा फिडेल कॅस्ट्रो यांचे ते भाऊ. त्यांच्या समोर करार होण्याला विशेष महत्व आहे.
ते अश्यासाठी की क्युबाचे राजनैतिक पातळीवर अमेरिकेबरोबर संबंध पूर्ववत झाले आहेत.
ज्यास्त काळ आपण क्रांतिकारी चळवळी हव्या तश्या चालू ठेवू शकत नाही आणि डाव्यांचे
राज्य आपल्या प्रदेशावर किंवा जगभर आणू शकत नाही याची उपरती कॅस्ट्रो बंधूना झाली
आणि तेंव्हाच डाव्या क्रांतिकारी चळवळी अजून किती काळ तग धरू शकतात हे कळाले.
ओबामांनी २०१० सालीच आपण क्युबाबरोबर संबंध पूर्ववत करणार आहोत असे सुतोवाच केले
होते. त्यानुसार ओबामांनी शब्द पाळला. कॅस्ट्रो बंधूंना पण हे उमगले कि आपण फार
काळ जगापासून, विकासापासून स्वतःला अलिप्त ठेवू शकत नाही. कोलंबियाच्या बाबतीत पण
ओबामांनी कुटनीतीचा वापर करून जॉन केरी या आपल्या विश्वासू आणि उमद्या मंत्र्याला
कोलंबिया सरकार आणि Farc मध्ये समेट घडवून आणण्यासाठी धाडले असावे आणि त्यासाठी
त्यांनी खास प्रत्यत्न केले असावेत अस म्हणायला जागा आहे.
अजून एक चकीत करणारी गोष्ट कोलंबिया सरकार आणि Farc
मधला अंतिम करार हा हॅवाना इथे कसा झाला, तो दुसरीकडे कुठेही होऊ शकला असता. यासाठी
इथे खूप मोठी खेळी आहे हे आपण समजायला पाहिजे. पूर्वी समस्त डाव्या चळवळींचे केंद्र
हे चे गवेरा आणि फिडेल कॅस्ट्रो यांच्या अधिपत्याखाली एकवटले होते. बहुतांशी लॅटिन
अमेरिकन देशांमध्ये डावी आणि समाजवादी विचारसरणीची सरकारे होती आणि कमी अधिक
प्रमाणात ती आजपण आहेत. पण अमेरिकेच्या चाणाक्ष कुटनीतीचे दर्शन आपल्याला इथे
घडते. क्युबा हा मोहरा आपल्या बाजूने वळवून अमेरिकेने डाव्या क्रांतिकारी
सत्ताकेंद्राना एकप्रकारे इशाराच दिला आणि आता क्युबाला समोर करून सर्व डाव्या
क्रांतिकारी चळवळी विखुरण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हॅवानामध्ये
कोलंबिया सरकार आणि Farc मध्ये झालेला करार आपल्याला हेच सूचित करतो.
२,५०,००० पेक्षा ज्यास्त
मृत्यू आणि ६०,००,००० पेक्षा ज्यास्त लोकांचे विस्थापन एवढीच काय ती Farc ची
कोलंबिया आणि जगाला देणगी ! त्यापेक्षा ज्यास्त काही नाही असेच Farc बद्दल वर्णन
करावे लागेल. युआन म्यॅनुएल सांतोस या कोलंबियाच्या राष्ट्रपती तसेच Farc कमांडर
टीमोलीओन यीमेनेझ यांनी रौउल कॅस्ट्रो यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्ष-या
केल्या आणि पाच दशकांपेक्षा अखंड लढत राहणारी Farc रुपी तलवार अखेर म्यान झाली. या
झालेल्या समेटावरून इतरही लॅटिन अमेरिकन देशांनी आणि (डाव्या क्रांतिकारी) जगाने काही
शिकावं इतकीच माफक अपेक्षा. याप्रसंगी भविष्यात अमेरिका अनेक तलवारी म्यान करेल अशी चिन्हे आहेत. बघुया काय होतं ते !
-निखील कासखेडीकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा