मुख्य सामग्रीवर वगळा

आणि दुसरं महायुद्ध संपलं...!

 काही घटना इतिहासात घडून त्यामुळे भूगोल बदलून जातो, आणि मग आज विचार केला तर लक्षात येतं की अश्या घडामोडी इतिहासात कश्या काय घडल्या असतील...कुठलही युद्ध हे मानवी इतिहासातलं सगळ्यात मोठं दाहक वास्तव आहे, जे त्यात्या काळानुसार बदलत गेलं, पण मानवसंहार होत राहिला, याला कारण म्हणजे माणूस प्राण्याची मानसिकता, अजून ज्यास्त प्रमाणात संपत्ती मिळवण्याची लालसा, या सर्व गोष्टी वारंवार घडल्यामुळे आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचं साधन म्हणून, युद्ध, उठाव, बंडखोरी, यादवी या सगळ्या संकल्पना अस्तित्वात आल्या... जिथे मानवी हस्तक्षेप आहे तिथे संघर्ष अटळ आहे, मग तो साम्राज्यासाठी असो, किंवा मिळालेल्या भूभागापैकी असमाधानी राहून, संपत्तीची लालसा ठेवून, किंवा अधिकार गाजवण्यासाठी असो, एकच सत्य आपल्याला समोर वारंवार प्रत्ययास येतं ते म्हणजे, मानवी जीवनात संघर्ष अटळ आहे, तो साम्राज्यासाठी असो, किंवा जमिनीच्या तुकड्यासाठी असो, किंवा मग पैशासाठी असो...


आधुनिक काळात मानव प्राण्याच्या इतिहासात आणि तो सुद्धा 20 व्या शतकात संघर्ष कुठं झाला असेल तर तो पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध यांच्या स्वरूपात झाला. 2 सप्टेंबर म्हणजे आजच्याच दिवशी 1945 ला दुसरं महायुद्ध संपलं अशी अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली, कागदपत्रांवर सह्या झाल्या, आणि मित्र राष्ट्रांनी हा विजय साजरा केला.

दुसरं महायुद्ध चालू झालं ते 1 सप्टेंबर 1939 ला आणि संपुष्टात आलं ते 2 सप्टेंबर 1945 ला. दुसरं महायुद्ध जवळपास 6 वर्ष आणि 1 दिवस चाललं. 20 व्या शतकात इतिहासात जर जागतिक पातळीवर कुठली मोठी घटना घडली असेल तर ती होती दुसरं महायुद्ध. महायुद्धाचे प्रणेते होते, 3 देश, जर्मनी, इटली, आणि जपान... ज्यांच्या बाजूने युद्ध लढलं गेलं, त्या व्यक्ती होत्या अनुक्रमे, जर्मनीचा हिटलर, इटलीचा मुसोलिनी, आणि जपानचा राजा हिरोहितो... हे महायुद्ध 2 गटांमध्ये लढलं गेलं. एकीकडे होते, मित्र राष्ट्र, तर दुसरीकडे होते अक्ष राष्ट्र. एकूण 30 देशांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला... मित्र राष्ट्रांमध्ये सहभागी देश होते, अमेरिका, ब्रिटन, सोव्हिएत महासंघ, फ्रांस, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन. तर दुसऱ्याबाजूला होते जर्मनी, इटली आणि जपान...

हिटलरने पोलंड वर स्वारी केली ती, 1939 मध्ये. पोलंडचा भूभाग नंतर जिंकल्यानंतर वाटून घेतला तो जर्मनी आणि तेंव्हाच्या रशियाने. ब्रिटन आणि फ्रांस यांचं जर्मनी आणि इटली बरोबर युद्ध झालं. 1940 ला फ्रांसचा पाडाव झाला. इकडे जपानने चीन विरुद्ध युद्ध आधीच सुरु केलं होतं, त्यामुळे जपान आपोआपच युद्धात सामील झाला. जपानने पर्ल हार्बर या अमेरिकी मिलिटरी बेसवर हल्ला चढवला, म्हणून आता तर अमेरिका सुद्धा युद्धात उतरली. युद्ध हे बर्याचश्या ठिकाणी लढलं गेलं, यात समावेश होता तो प्रामुख्याने युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडातल्या देशांचा आणि त्यांच्या भूभागांचा. या दरम्यान भीषण असा मानावसंहार झाला. एकूण लष्करी आणि सामान्य नागरिक मिळून 7 कोटींच्या आसपास लोक मारले गेले. 1942 पर्यंत युद्धामध्ये जर्मनीचं पारडं जाड होतं, आणि अक्ष राष्ट्र युद्ध जिंकणार असं वाटत होत, पण जर्मनीने राशियाविरुद्ध युद्ध पुकारल्यावर स्टालिनग्राड इथल्या अटीतटीच्या लढाईत जर्मनी मागे पडला. पुढे जाऊन तर जर्मनी आणि इटली यांनी शरणागती पत्करली तरीसुद्धा जपान मात्र मागे राहायला तयार नव्हता. जपानने सांगितलं की आम्ही मित्र राष्ट्रांबरोबर युद्द चालूच ठेवू... झालं! या नंतर साऱ्या मानवी जगाच्या इतिहासात ज्याची काळ्या अक्षराने नोंद झाली त्या घटना घडल्या. जपान शरण जात नाही, हे कळल्यावर अमेरिकेने जपान विरुद्ध अणुबॉम्ब वापरायचं ठरवलं. रशियाच्या स्टालिनने याला मूकसंमती दिली. मानवी इतिहासात न भूतो न भविष्यती अश्या स्वरूपाचा मानवसंहार समोर दिसत होता. अमेरिकेने 6 ऑगस्टला हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकला... आणि लगेच 2 दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्टला दुसरा अणुबॉम्ब नागासाकीवर टाकला. जणू अनेक सूर्य एकाच वेळी प्रज्वलित झाले की काय असंच वाटावं इतकी प्रखर ऊर्जा आणि प्रकाश अणुबॉम्ब टाकल्यानंतर पाहायला मिळाला.
जपानने अजून अणुबॉम्ब पडतील या भीतीने तसंच रशियाच्या युद्धतल्या प्रवेशामुळे माघार घेऊन शरणागती पत्करली. जपानने 2 सप्टेंबर 1945 ला USS Missouri या अमेरिकेच्या युद्धनौकेवर कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या आणि अधिकृतरित्या महायुद्ध संपल्याची घोषणा करण्यात आली.
यानंतर जागतिक समीकरण बदलली. अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये शीतयुद्ध चालू झालं, युरोप युद्धातून परत उभा राहिला... जपानने आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्तरांवर मोठी झेप घेतली. अमेरिका महासत्ता झाली, सोव्हिएत रशियाचे विघटन झालं... हे सगळं होऊनसुद्धा दुसऱ्या महायुद्धचा परिणाम खूप मोठा झाला. पहिल्यांदाच अणुबॉम्बच्या वापरामुळे, साऱ्या जगाला धास्ती वाटली ती म्हणजे दोन देशांमध्ये जर युद्ध झालं आणि त्यात अणुबॉम्ब वापरला गेला तर काय होईल, याची झलक जपानवर अणुबॉम्ब टाकून जगाने अनुभवली होती...
अनेक देश स्वतंत्र झाले, आंतराष्ट्रीय संघटना स्थापन झाल्या, आणि एका नव्या दिशेने नव्या जगाची वाटचाल शांततेकडे सुरु झाली. पण यातून अनेक नवीन प्रश्न उभे राहिले, त्याबद्दल परत कधीतरी...!

- निखिल कासखेडीकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...

अमेरिकेत जवळपास ५० वर्षानंतर झाली UFO संदर्भात बैठक!

  अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात... म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO ... म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तु! अश्या वस्तु ज्याचं मूळ बाहेरचं आहे असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं. अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अश्या विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP , म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यन्त जवळपास १४० अश्या केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलटसन...

फार्क (FARC) रुपी तलवार म्यान !

कोलंबिया म्हणजे जगविख्यात लेखक नोबेल विजेते गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांची भूमी! जशी ही थोर साहित्यिकांची, लेखकांची भूमी तशीच ही Farc (रिव्हॉलुशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या डाव्या क्रांतिकारी संघटनेची पण आद्य भूमी. या क्रांतिकारी गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गट काही डाव्या क्रांतिकारी विचारवंतांचा गट नाही. स्थापनेपासूनच या गटात विचारवंत नाही तर सामान्य गरीब शेतकरी सामील झालेले होते. या गटाची निर्मिती साम्राज्यवादाला विरोध आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे महत्व आणि वर्चस्व मान्य असणे या दोन मुलभूत घटकांवर झाली. साधारणतः अनेक डाव्या क्रांतिकारी चळवळी आणि गटांप्रामाणे या Farc चाही भर स्वतःची सैनिकी फौज असण्यामध्ये होता. १९६४ पासून हा गट कार्यरत झाला. पण दुर्भाग्य म्हणजे या गटाची मदार ही अपहरण करणे आणि खंडणी मिळवणे तसेच ड्रग्सचे स्मगलिंग करणे यांवर होती. पण नुकत्याच कोलंबियन सरकार आणि Farc नेत्यांमध्ये झालेल्या करारामुळे साधारणतः ५० वर्षे चाललेला सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अजून सार्वमत घेऊन ह्या कराराला अंतिम मान्यता मिळणे बाकी आह...