काही घटना इतिहासात घडून त्यामुळे भूगोल बदलून जातो, आणि मग आज विचार केला तर लक्षात येतं की अश्या घडामोडी इतिहासात कश्या काय घडल्या असतील...कुठलही युद्ध हे मानवी इतिहासातलं सगळ्यात मोठं दाहक वास्तव आहे, जे त्यात्या काळानुसार बदलत गेलं, पण मानवसंहार होत राहिला, याला कारण म्हणजे माणूस प्राण्याची मानसिकता, अजून ज्यास्त प्रमाणात संपत्ती मिळवण्याची लालसा, या सर्व गोष्टी वारंवार घडल्यामुळे आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचं साधन म्हणून, युद्ध, उठाव, बंडखोरी, यादवी या सगळ्या संकल्पना अस्तित्वात आल्या... जिथे मानवी हस्तक्षेप आहे तिथे संघर्ष अटळ आहे, मग तो साम्राज्यासाठी असो, किंवा मिळालेल्या भूभागापैकी असमाधानी राहून, संपत्तीची लालसा ठेवून, किंवा अधिकार गाजवण्यासाठी असो, एकच सत्य आपल्याला समोर वारंवार प्रत्ययास येतं ते म्हणजे, मानवी जीवनात संघर्ष अटळ आहे, तो साम्राज्यासाठी असो, किंवा जमिनीच्या तुकड्यासाठी असो, किंवा मग पैशासाठी असो...
आधुनिक काळात मानव प्राण्याच्या इतिहासात आणि तो सुद्धा 20 व्या शतकात संघर्ष कुठं झाला असेल तर तो पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध यांच्या स्वरूपात झाला. 2 सप्टेंबर म्हणजे आजच्याच दिवशी 1945 ला दुसरं महायुद्ध संपलं अशी अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली, कागदपत्रांवर सह्या झाल्या, आणि मित्र राष्ट्रांनी हा विजय साजरा केला.
दुसरं महायुद्ध चालू झालं ते 1 सप्टेंबर 1939 ला आणि संपुष्टात आलं ते 2 सप्टेंबर 1945 ला. दुसरं महायुद्ध जवळपास 6 वर्ष आणि 1 दिवस चाललं. 20 व्या शतकात इतिहासात जर जागतिक पातळीवर कुठली मोठी घटना घडली असेल तर ती होती दुसरं महायुद्ध. महायुद्धाचे प्रणेते होते, 3 देश, जर्मनी, इटली, आणि जपान... ज्यांच्या बाजूने युद्ध लढलं गेलं, त्या व्यक्ती होत्या अनुक्रमे, जर्मनीचा हिटलर, इटलीचा मुसोलिनी, आणि जपानचा राजा हिरोहितो... हे महायुद्ध 2 गटांमध्ये लढलं गेलं. एकीकडे होते, मित्र राष्ट्र, तर दुसरीकडे होते अक्ष राष्ट्र. एकूण 30 देशांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला... मित्र राष्ट्रांमध्ये सहभागी देश होते, अमेरिका, ब्रिटन, सोव्हिएत महासंघ, फ्रांस, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, चीन. तर दुसऱ्याबाजूला होते जर्मनी, इटली आणि जपान...
हिटलरने पोलंड वर स्वारी केली ती, 1939 मध्ये. पोलंडचा भूभाग नंतर जिंकल्यानंतर वाटून घेतला तो जर्मनी आणि तेंव्हाच्या रशियाने. ब्रिटन आणि फ्रांस यांचं जर्मनी आणि इटली बरोबर युद्ध झालं. 1940 ला फ्रांसचा पाडाव झाला. इकडे जपानने चीन विरुद्ध युद्ध आधीच सुरु केलं होतं, त्यामुळे जपान आपोआपच युद्धात सामील झाला. जपानने पर्ल हार्बर या अमेरिकी मिलिटरी बेसवर हल्ला चढवला, म्हणून आता तर अमेरिका सुद्धा युद्धात उतरली. युद्ध हे बर्याचश्या ठिकाणी लढलं गेलं, यात समावेश होता तो प्रामुख्याने युरोप, आफ्रिका आणि आशिया खंडातल्या देशांचा आणि त्यांच्या भूभागांचा. या दरम्यान भीषण असा मानावसंहार झाला. एकूण लष्करी आणि सामान्य नागरिक मिळून 7 कोटींच्या आसपास लोक मारले गेले. 1942 पर्यंत युद्धामध्ये जर्मनीचं पारडं जाड होतं, आणि अक्ष राष्ट्र युद्ध जिंकणार असं वाटत होत, पण जर्मनीने राशियाविरुद्ध युद्ध पुकारल्यावर स्टालिनग्राड इथल्या अटीतटीच्या लढाईत जर्मनी मागे पडला. पुढे जाऊन तर जर्मनी आणि इटली यांनी शरणागती पत्करली तरीसुद्धा जपान मात्र मागे राहायला तयार नव्हता. जपानने सांगितलं की आम्ही मित्र राष्ट्रांबरोबर युद्द चालूच ठेवू... झालं! या नंतर साऱ्या मानवी जगाच्या इतिहासात ज्याची काळ्या अक्षराने नोंद झाली त्या घटना घडल्या. जपान शरण जात नाही, हे कळल्यावर अमेरिकेने जपान विरुद्ध अणुबॉम्ब वापरायचं ठरवलं. रशियाच्या स्टालिनने याला मूकसंमती दिली. मानवी इतिहासात न भूतो न भविष्यती अश्या स्वरूपाचा मानवसंहार समोर दिसत होता. अमेरिकेने 6 ऑगस्टला हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकला... आणि लगेच 2 दिवसांनी म्हणजे 9 ऑगस्टला दुसरा अणुबॉम्ब नागासाकीवर टाकला. जणू अनेक सूर्य एकाच वेळी प्रज्वलित झाले की काय असंच वाटावं इतकी प्रखर ऊर्जा आणि प्रकाश अणुबॉम्ब टाकल्यानंतर पाहायला मिळाला.
जपानने अजून अणुबॉम्ब पडतील या भीतीने तसंच रशियाच्या युद्धतल्या प्रवेशामुळे माघार घेऊन शरणागती पत्करली. जपानने 2 सप्टेंबर 1945 ला USS Missouri या अमेरिकेच्या युद्धनौकेवर कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या आणि अधिकृतरित्या महायुद्ध संपल्याची घोषणा करण्यात आली.
यानंतर जागतिक समीकरण बदलली. अमेरिका आणि सोव्हिएत रशियामध्ये शीतयुद्ध चालू झालं, युरोप युद्धातून परत उभा राहिला... जपानने आर्थिक, सामाजिक आणि राजकीय स्तरांवर मोठी झेप घेतली. अमेरिका महासत्ता झाली, सोव्हिएत रशियाचे विघटन झालं... हे सगळं होऊनसुद्धा दुसऱ्या महायुद्धचा परिणाम खूप मोठा झाला. पहिल्यांदाच अणुबॉम्बच्या वापरामुळे, साऱ्या जगाला धास्ती वाटली ती म्हणजे दोन देशांमध्ये जर युद्ध झालं आणि त्यात अणुबॉम्ब वापरला गेला तर काय होईल, याची झलक जपानवर अणुबॉम्ब टाकून जगाने अनुभवली होती...
अनेक देश स्वतंत्र झाले, आंतराष्ट्रीय संघटना स्थापन झाल्या, आणि एका नव्या दिशेने नव्या जगाची वाटचाल शांततेकडे सुरु झाली. पण यातून अनेक नवीन प्रश्न उभे राहिले, त्याबद्दल परत कधीतरी...!
- निखिल कासखेडीकर


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा