मुख्य सामग्रीवर वगळा

वँग यी – जेष्ठ चीनी मुत्सद्दी

वँग यी यांची खूप मोठी ओळख करून द्यायची गरज नाही. त्याचं नांव आपण चीन संदर्भातल्या बातम्यांबरोबर    वाचत असू. वँग यी म्हणजे तीच व्यक्ती जिने चीनची बाजू डोक्लाम संदर्भात मांडली होती आणि डोक्लाम प्रश्नावर कठोर भूमिका घेतली होती. भारतासंदर्भात बोलायचं झाल्यास भारताचे जे सद्य परराष्ट्र सचिव आहेत, विजय गोखले, यांनी डोक्लाम वाटाघाटींदरम्यान महत्वाची भूमिका बजावली होती असे म्हटले जाते. विजय गोखले तेंव्हा परराष्ट्र सचिव नव्हते. असो. तर वँग यी हे चीनचे परराष्ट्र मंत्री! नुकतीच त्यांची चीनच्या ‘स्टेट कौन्सिलर’ पदी नियुक्ती झाली आहे. वँग यी यांच्याकडे दोन जबाबदाऱ्या आल्या आहेत आता. एक तर परराष्ट्र मंत्री पदाची जबाबदारी आणि दुसरी म्हणजे स्टेट कौन्सिलर पदाची जबाबदारी. अश्या जबाबदाऱ्या असणारे वँग यी ही मागच्या काही वर्षातली पहिली व्यक्ती आहे.



वँग यी यांना उत्तम जपानी भाषा आणि इंग्रजी भाषा बोलता येतं. ते अमेरिकेतल्या जॉर्ज टाऊन विद्यापीठात काही काळ व्हिजिटिंग स्कॉलर सुद्धा होते. तसंच मागच्या दोन वर्षात त्यांचे चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत. बर्याच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर यी, जिनपिंग यांचे विचार, पण थोडेसे अधिकृतपणे मांडताना दिसले आहेत. यी हे करियर डिप्लोमॅट आहेत. त्यांनी स्टेट कौन्सिलर पदाचा कार्यभार सांभाळायच्या आधी चीनचे उप-परराष्ट्र मंत्री, तसेच चीनचे जपान मधले दूत आणि तैवान प्रश्नांवरच्या कार्यालयाचे डिरेक्टर म्हणून, अश्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

डोक्लाम प्रश्नावर तर त्यांनी एकदा गौप्यस्फोटच केला. ते म्हणाले, भारताने आम्ही डोक्लाम मध्ये घुसखोरी केली आहे हे मान्य केलं आहे. असा आमच्याकडे पुरावा आहे आणि यांवर उत्तर म्हणजे भारताने त्यांचे सैन्य सिक्कीम भागातून मागे घ्यावे हेच डोक्लाम समस्येचे उत्तर असेल, असे सांगून टाकले.

त्यांच्याकडे मध्य पूर्वेतल्या देशांबरोबर चीनचे आधिकारिक संबंध दृढ करण्याचे श्रेय जाते. त्यांच्या मते दोन देशांदरम्यान सुरु असलेल्या समस्येचे उत्तर हे कुठल्याही युद्धाने सोडवता येत नसते. तर चर्चा आणि शांततामय मार्गानेच समस्या सुटते. यी बोलायला म्हणजे तसा स्ट्रेटफोरवर्ड माणूस. एकदा ते कॅनडा दोर्यावर गेले असताना, ते आणि कॅनडाचे परराष्ट्र मंत्री व्यासपीठावर पत्रकार परिषदेत बोलत असताना, एका कॅनेडीयन महिला पत्रकाराने त्यांना चीनच्या ह्युमन राईटस संदर्भात प्रश्न विचारलं असता, वँग यी चिडले. आणि त्या पत्रकाराला म्हणाले तुम्ही जो प्रश्न विचारता आहात त्यातून तुमचा चीनकडे बघण्याचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोण दिसतो. हा उद्धटपणा तुमच्यात कुठून आला. तुमचं हे असं बोलणं मला मान्य नाही. या प्रकरणात पुढे काय झालं त्याबद्दल माहिती नाही. पण बहुदा ते प्रकरण तिथेच मिटलं असावं. कारण पत्रकार परिषद म्हणजे वेडेवाकडे प्रश्न असतातच आणि ते जर कोणी दुसऱ्या देशातल्या पत्रकाराने विचारले तर त्याला सावधपणे उत्तर देण्याची जबाबदारी ही त्या व्यक्तीची असते.      

वँग यी यांच्या नेमणूकीकडे भारत कुठल्या दृष्टीकोणातून पाहतो हे येत्या काळात दिसेलच. नुकतेच यी यांनी भारत चीन संबंधासंदर्भात एक विधान केले. हे विधान फार सूचक आहे आणि भविष्यातले भारत चीन संबंध कसे असतील याची वाच्यता करणारे आहेत. वँग यी म्हणाले, भारत आणि चीन यांनी आपापसात भांडत बसू नये. भारत आणि चीन जर एकत्र आले तर एक आणि एक दोन न राहता ते अकरा होतील म्हणजे थोडक्यात या दोन देशांच्या एकीने या दोन देशांचीच ताकद वाढेल, म्हणून आपापसातली भांडणे मिटायला हवीत. डॅ्गन आणि एलिफंट यांनी भांडू नये. भारत आणि चीनला बरोबर एकत्र काम करता येईल. लवकरच वँग यी यांची चीनचे भारत चीन सीमा प्रश्नी विशेष दूत (Special Representative) म्हणून नेमणूक होण्याची शक्यता आहे.

जिनपिंग चीनचे तहहयात अध्यक्ष असतील असे चित्र दिसल्यानंतर, त्यांच्या मंत्री मंडळाकडे सार्या जगाचे लक्ष्य आहे. त्यामुळे, साहजिकच वँग यी यांच्याकडे पण सर्वांचे नीट लक्ष असेल. ते भारत चीन दरम्यान कुठला पवित्रा घेतात, यांवर आणि भारताकडून अजित डोवल कसे त्यांच्याशी जुळवून घेतात आणि भारत पुढे या समस्येची काय आखणी करतो, हे पाहणं महत्वाचं आहे.

आता तरी चीनचा नरमाईची सूर आहे, आणि जिनपिंग मोदी यांची मैत्री पण दृढ होत आहे असे चित्र दिसते आहे. पण चीनशी सावधपणे मैत्री करावी लागेल. ठोस धोरण ठरवावे लागेल. बर्याचदा एखाद्या देशाचे धोरण ठरवताना त्या देशाच्या मंत्र्याचे त्याच्याच खात्याच्या पण दुसऱ्या देशाच्या मंत्र्याशी कसे संबंध आहेत हे त्या दोन व्यक्तींच्या वैयक्तिक संबंधांवर ठरते असे म्हणतात. म्हणजे दोघांच्यातल्या मैत्रीचा परिणाम दोन देशांच्या धोरणांवर होतो, हे निश्चितपणे म्हणता येईल.

वँग यी यांनी येत्या काळात एक पाऊल मागे घेऊन भारताशी सल्ला मसलत करून सीमा प्रश्नावर तोडगा काढायचं ठरवल्यास तो चीन आणि भारतासाठी महत्वाचा दिवस असेल. पण तूर्तास तरी सीमेवर डॅ्गन आणि एलिफंट शांत आहेत, भविष्यात हे दोन देश कसे वागतील किंवा अगदी चीन भारताशी कसा वागेल याचे उत्तर वँग यी यांच्याकडे नक्कीच असेल, कारण त्यांना ऑरडर्स थेट झी जिनपिंग यांच्याकडून येतील.

 

-निखील कासखेडीकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...

अमेरिकेत जवळपास ५० वर्षानंतर झाली UFO संदर्भात बैठक!

  अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात... म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO ... म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तु! अश्या वस्तु ज्याचं मूळ बाहेरचं आहे असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं. अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अश्या विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP , म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यन्त जवळपास १४० अश्या केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलटसन...

फार्क (FARC) रुपी तलवार म्यान !

कोलंबिया म्हणजे जगविख्यात लेखक नोबेल विजेते गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांची भूमी! जशी ही थोर साहित्यिकांची, लेखकांची भूमी तशीच ही Farc (रिव्हॉलुशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या डाव्या क्रांतिकारी संघटनेची पण आद्य भूमी. या क्रांतिकारी गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गट काही डाव्या क्रांतिकारी विचारवंतांचा गट नाही. स्थापनेपासूनच या गटात विचारवंत नाही तर सामान्य गरीब शेतकरी सामील झालेले होते. या गटाची निर्मिती साम्राज्यवादाला विरोध आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे महत्व आणि वर्चस्व मान्य असणे या दोन मुलभूत घटकांवर झाली. साधारणतः अनेक डाव्या क्रांतिकारी चळवळी आणि गटांप्रामाणे या Farc चाही भर स्वतःची सैनिकी फौज असण्यामध्ये होता. १९६४ पासून हा गट कार्यरत झाला. पण दुर्भाग्य म्हणजे या गटाची मदार ही अपहरण करणे आणि खंडणी मिळवणे तसेच ड्रग्सचे स्मगलिंग करणे यांवर होती. पण नुकत्याच कोलंबियन सरकार आणि Farc नेत्यांमध्ये झालेल्या करारामुळे साधारणतः ५० वर्षे चाललेला सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अजून सार्वमत घेऊन ह्या कराराला अंतिम मान्यता मिळणे बाकी आह...