वँग यी यांची खूप मोठी ओळख करून द्यायची गरज
नाही. त्याचं नांव आपण चीन संदर्भातल्या बातम्यांबरोबर वाचत असू. वँग यी म्हणजे तीच व्यक्ती जिने
चीनची बाजू डोक्लाम संदर्भात मांडली होती आणि डोक्लाम प्रश्नावर कठोर भूमिका घेतली
होती. भारतासंदर्भात बोलायचं झाल्यास भारताचे जे सद्य परराष्ट्र सचिव आहेत, विजय
गोखले, यांनी डोक्लाम वाटाघाटींदरम्यान महत्वाची भूमिका बजावली होती असे म्हटले
जाते. विजय गोखले तेंव्हा परराष्ट्र सचिव नव्हते. असो. तर वँग यी हे चीनचे
परराष्ट्र मंत्री! नुकतीच त्यांची चीनच्या ‘स्टेट कौन्सिलर’ पदी नियुक्ती झाली
आहे. वँग यी यांच्याकडे दोन जबाबदाऱ्या आल्या आहेत आता. एक तर परराष्ट्र मंत्री
पदाची जबाबदारी आणि दुसरी म्हणजे स्टेट कौन्सिलर पदाची जबाबदारी. अश्या जबाबदाऱ्या
असणारे वँग यी ही मागच्या काही वर्षातली पहिली व्यक्ती आहे.
वँग यी यांना उत्तम जपानी भाषा आणि इंग्रजी भाषा
बोलता येतं. ते अमेरिकेतल्या जॉर्ज टाऊन विद्यापीठात काही काळ व्हिजिटिंग स्कॉलर
सुद्धा होते. तसंच मागच्या दोन वर्षात त्यांचे चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांच्याबरोबर
चांगले संबंध आहेत. बर्याच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर यी, जिनपिंग यांचे विचार,
पण थोडेसे अधिकृतपणे मांडताना दिसले आहेत. यी हे करियर डिप्लोमॅट आहेत. त्यांनी
स्टेट कौन्सिलर पदाचा कार्यभार सांभाळायच्या आधी चीनचे उप-परराष्ट्र मंत्री, तसेच
चीनचे जपान मधले दूत आणि तैवान प्रश्नांवरच्या कार्यालयाचे डिरेक्टर म्हणून, अश्या
जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
डोक्लाम प्रश्नावर तर त्यांनी एकदा गौप्यस्फोटच
केला. ते म्हणाले, भारताने आम्ही डोक्लाम मध्ये घुसखोरी केली आहे हे मान्य केलं
आहे. असा आमच्याकडे पुरावा आहे आणि यांवर उत्तर म्हणजे भारताने त्यांचे सैन्य
सिक्कीम भागातून मागे घ्यावे हेच डोक्लाम समस्येचे उत्तर असेल, असे सांगून टाकले.
त्यांच्याकडे मध्य पूर्वेतल्या देशांबरोबर चीनचे
आधिकारिक संबंध दृढ करण्याचे श्रेय जाते. त्यांच्या मते दोन देशांदरम्यान सुरु
असलेल्या समस्येचे उत्तर हे कुठल्याही युद्धाने सोडवता येत नसते. तर चर्चा आणि
शांततामय मार्गानेच समस्या सुटते. यी बोलायला म्हणजे तसा स्ट्रेटफोरवर्ड माणूस. एकदा
ते कॅनडा दोर्यावर गेले असताना, ते आणि कॅनडाचे परराष्ट्र मंत्री व्यासपीठावर पत्रकार
परिषदेत बोलत असताना, एका कॅनेडीयन महिला पत्रकाराने त्यांना चीनच्या ह्युमन राईटस
संदर्भात प्रश्न विचारलं असता, वँग यी चिडले. आणि त्या पत्रकाराला म्हणाले तुम्ही
जो प्रश्न विचारता आहात त्यातून तुमचा चीनकडे बघण्याचा पूर्वग्रहदुषित दृष्टीकोण
दिसतो. हा उद्धटपणा तुमच्यात कुठून आला. तुमचं हे असं बोलणं मला मान्य नाही. या
प्रकरणात पुढे काय झालं त्याबद्दल माहिती नाही. पण बहुदा ते प्रकरण तिथेच मिटलं
असावं. कारण पत्रकार परिषद म्हणजे वेडेवाकडे प्रश्न असतातच आणि ते जर कोणी दुसऱ्या
देशातल्या पत्रकाराने विचारले तर त्याला सावधपणे उत्तर देण्याची जबाबदारी ही त्या
व्यक्तीची असते.
वँग यी यांच्या नेमणूकीकडे भारत कुठल्या
दृष्टीकोणातून पाहतो हे येत्या काळात दिसेलच. नुकतेच यी यांनी भारत चीन
संबंधासंदर्भात एक विधान केले. हे विधान फार सूचक आहे आणि भविष्यातले भारत चीन संबंध
कसे असतील याची वाच्यता करणारे आहेत. वँग यी म्हणाले, भारत आणि चीन यांनी आपापसात
भांडत बसू नये. भारत आणि चीन जर एकत्र आले तर एक आणि एक दोन न राहता ते अकरा होतील
म्हणजे थोडक्यात या दोन देशांच्या एकीने या दोन देशांचीच ताकद वाढेल, म्हणून
आपापसातली भांडणे मिटायला हवीत. डॅ्गन आणि एलिफंट यांनी भांडू नये. भारत आणि चीनला
बरोबर एकत्र काम करता येईल. लवकरच वँग यी यांची चीनचे भारत चीन सीमा प्रश्नी विशेष
दूत (Special Representative) म्हणून नेमणूक होण्याची शक्यता आहे.
जिनपिंग चीनचे तहहयात अध्यक्ष असतील असे चित्र
दिसल्यानंतर, त्यांच्या मंत्री मंडळाकडे सार्या जगाचे लक्ष्य आहे. त्यामुळे,
साहजिकच वँग यी यांच्याकडे पण सर्वांचे नीट लक्ष असेल. ते भारत चीन दरम्यान कुठला
पवित्रा घेतात, यांवर आणि भारताकडून अजित डोवल कसे त्यांच्याशी जुळवून घेतात आणि
भारत पुढे या समस्येची काय आखणी करतो, हे पाहणं महत्वाचं आहे.
आता तरी चीनचा नरमाईची सूर आहे, आणि जिनपिंग
मोदी यांची मैत्री पण दृढ होत आहे असे चित्र दिसते आहे. पण चीनशी सावधपणे मैत्री
करावी लागेल. ठोस धोरण ठरवावे लागेल. बर्याचदा एखाद्या देशाचे धोरण ठरवताना त्या
देशाच्या मंत्र्याचे त्याच्याच खात्याच्या पण दुसऱ्या देशाच्या मंत्र्याशी कसे
संबंध आहेत हे त्या दोन व्यक्तींच्या वैयक्तिक संबंधांवर ठरते असे म्हणतात. म्हणजे
दोघांच्यातल्या मैत्रीचा परिणाम दोन देशांच्या धोरणांवर होतो, हे निश्चितपणे
म्हणता येईल.
वँग यी यांनी येत्या काळात एक पाऊल मागे घेऊन
भारताशी सल्ला मसलत करून सीमा प्रश्नावर तोडगा काढायचं ठरवल्यास तो चीन आणि
भारतासाठी महत्वाचा दिवस असेल. पण तूर्तास तरी सीमेवर डॅ्गन आणि एलिफंट शांत आहेत,
भविष्यात हे दोन देश कसे वागतील किंवा अगदी चीन भारताशी कसा वागेल याचे उत्तर वँग
यी यांच्याकडे नक्कीच असेल, कारण त्यांना ऑरडर्स थेट झी जिनपिंग यांच्याकडून
येतील.
-निखील कासखेडीकर

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा