मुख्य सामग्रीवर वगळा

ट्रॅफिक जॅम – सुएझ कालवा...

 23 मार्चला इजिप्तच्या सुएझ कालव्यात एव्हरग्रीन मरीन या तैवानच्या कंपनीचं एवर गिव्हन हे मालवाहू जहाज सुएझ कालवा पार करत असताना अडकून पडलं. ते जमिनीत रूतलं आणि ते अश्या पद्धतीने अडकून पडलं की दोन्ही बाजूनी येणार्‍या आणि जाणार्‍या मालवाहू जहाजांचा रस्ताच बंद झाला. यामुळे जलवाहतुकीवर परिणाम होऊन साधारणत: तीनशे मालवाहू जहाजं अडकून पडली आहेत. यामुळे खूप मोठं आर्थिक नुकसान जगाला झेलावं लागत आहे. तासाला 400 मिलियन डॉलर्स, तर दिवसाला 9.6 बिलियन डॉलर्स एवढं आर्थिक नुकसान होत आहे. 14 टग बोटी हे जहाज परत पाण्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, याचं कारण, ते जहाज मातीत रूतलं आहे.



काही बातम्यांनुसार यामुळे संपूर्ण जलवाहतुकीबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. याचं कारण असं आहे की, तज्ञांनी सांगितल्यानुसार सध्याच्या काळातली मालवाहू जहाज कमी कर्मचारी वर्ग, कमी जागेत खूप माल भरणे आणि कमी स्किल असलेला कर्मचारी वर्ग या सर्व गोष्टींमुळे जलवाहतुकीच्या क्षेत्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. एवर गिव्हन या जहाजाबद्दल बोलायचं झाल्यास मालवाहू जहाजाचा कर्मचारी वर्ग हा भारतीय आहे. हे कर्मचारी-अधिकारी मिळून 25 लोक या जहाजावर आहेत. जहाजाच्या कंपनीनुसार हे जहाज वादळी वार्‍यांमुळे आणि मोठ्या लाटांमुळे भरकटत जाऊन सुएझ कालव्यात अडकले. पण तज्ञानुसार मार्गातून जात असताना जहाजाचा वेग हा 8 नॉटिकल माइल्स इतका असायला होता, पण प्रत्यक्ष त्याचा वेग हा 30 नॉटिकल माइल्स एवढा होता, याचं कारण कंपनीकडून सांगण्यात आलं की मोठ्या लाटा असल्यामुळे ते अडकून पडायला नको म्हणून त्या जहाजाचा वेग वाढवण्यात आला. याबरोबर दुसरं कारण म्हणजे तज्ञानुसार, दहा वर्षापूर्वी 10000 कंटेनर वाहून नेणारी मालवाहू जहाज होती, पण आता एव्हर गिव्हन या जहाजाचं उदाहरण घेतल्यास यावर 20,000 कंटेनर्स आहेत, म्हणजे 10 वर्षात या मालवाहू जहाजांची, दुप्पट माल वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यात आली. तिसरा मुद्दा हा की, या जहाजाची लांबी 400 मीटर आहे. आता एवढे अजस्त्र जहाज सुएझ कालव्यातून सहजासहजी जाऊ शकेल का? या बद्दल सुदधा शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.

सुएझ कालवा अनेक कारणासाठी महत्वाचा आहे. एकूण जागतिक व्यापारापैकी 12% व्यापार हा या जलवाहतुकीतून, कालव्यातून होतो. तसेच एकूण जलवाहतुकीच्या व्यापारापैकी 30% जलवाहतुक व्यापार हा या कालव्यातून होतो. हा कालवा इजिप्तच्या मालकीचा आहे. व्यापार ठप्प झाल्यामुळे ईजीप्त सरकारला 14 मिलियन डॉलर्स एवढं नुकसान दर दिवसाला होतं आहे. सुएझ कालवा हा एकूण 193 किलोमीटर एवढ्या लांबीचा आहे. सुरवातीला एकच लेन या कालव्यात होती. आशिया आणि युरोप खंडांना जोडणारा दुवा म्हणून या कालव्याचं महत्व आहे. याचबरोबर भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र या दोघांना हा सुएझ कालवा जोडण्याचं काम करतो. आशिया आणि आफ्रिका खंडाना वेगळं करण्याचं कामसुद्धा हा कालवा करतो. या कालव्याच्या उत्तरेला पोर्ट सैद बंदर आहे, तर दक्षिणेला पोर्ट तौफिक बंदर आहे. याचं विशेष म्हणजे दोन्ही बाजूंना पाण्याची पातळी ही समुद्राच्या पातळी एवढी ठेवण्यात आली आहे. या कालव्यामुळे इंधनाचा खर्च, आणि वेळेची बचत झाली आहे. सुएझ कालव्यावर नियंत्रण हे सुएझ कॅनल कंपनीकडे आहे. ही इजिप्त सरकारची कंपनी आहे. जहाजांच्या आकारमानांनुसार आणि प्रकारानुसार वेळोवेळी कालव्याची रुंदी आणि खोली वाढवण्यात आली आहे. पर्शियन आखाती देशातील खनिज तेल युरोपिय देशांकडे वाहून नेणार्‍या ऑइल टँकरची संख्या यात जास्त आहे. या कालव्यातून कोळसा, खनिज द्रव्ये, धातू, तेलबिया, सीमेंट, खते, तृणधान्ये आणि यंत्रसामग्री यांची जास्त वाहतूक असते. अंदाजे दिवसाला 50 मालवाहतुक जहाजं या कालव्यातून ये जा करतात.



इजिप्तचे सर्वेसर्वा गमाल अब्दुल नासर यांनी 1956 रोजी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केल्यानंतर इतिहासात प्रसिद्ध असा सुएझ क्रायसिस निर्माण झाला होता. या दरम्यान कालवा 8 वर्ष बंद करण्यात आला होता. 1975 ला परत हा कालवा सुरू करण्यात आला. यामुळे या कालव्याला सामरीक महत्व आहे. या कालव्यात अजून एक लेन तयार करण्यात आली जेणेकरून ट्रान्झिट टाईम वाढून यातून 100 जहाजं ये जा करू शकतील अशी योजना करण्यात आली. 1859 साली सुएझ कालवा तयार करण्याचे काम सुरू झाले. आणि 1869 ला काम पूर्ण झाले. हा मानवनिर्मित कालवा आहे.

परत मुद्दयाकडे यायचं म्हणजे, एवर गिव्हन हे जहाजाच नाव आहे, हे जहाज ऑपरेट करणारी एव्हर ग्रीन मरीन ही तैवानची कंपनी आहे, तर जहाजाची मालकी, शोई किसेन या जपानी कंपनीची आहे. हे जहाज तैवानहून निघून नेदरलँडच्या रोटरडम या बंदराकडे निघालं  होतं. सुएझ कालव्यातून या जहाजाला जायचं असेल तर एकूण 18520 किलोमीटर एवढं अंतर कापत जावं लागेल आणि यासाठी 25 दिवसाचा कालावधी लागेल. तर याचा दुसरा पर्यायी मार्ग म्हणजे आफ्रिकेच्या दक्षिण दिशेला असणार्‍या केप ऑफ गुड होप वरुन वळसा घालून मग अटलांटिक् समुद्रावरुन जाऊन रोटरडम बंदराला पोहोचता येईल, पण यासाठी 25000 किलोमीटर एवढं अंतर पार करावं लागेल आणि यासाठी 35 दिवस लागतील. एव्हर गिव्हन अडकल्यामुळे आता इतर अडकलेल्या आणि खोळंबून राहिलेल्या जहाजांसाठी दोनच पर्याय शिल्लक आहेत, ते असे की अजून एव्हर गिव्हन जहाज पूर्ण बाहेर निघून वाहतूक पूर्ववत होईपर्यंत तिथेच थांबायचं किंवा मग केप ऑफ गुड होप या पर्यायी मार्गाने आपाआपल्या ठरलेल्या स्थळी जायचं.

एकूणच काय तर एक मानवनिर्मित कालवा जागतिक व्यापार थांबवू शकतो आणि शेकडो कोटी डॉलर्सच नुकसान करू शकतो, इतका हा कालवा महत्वाचा आहे. ब्रिटनच्या एका कंपनीचं 1.7 मिलियन पौंडाचं फर्निचर या जहाजात अडकून पडलं आहे. तर महाराष्ट्रातून जागतिक बाजारपेठेत निर्यात होणारी द्राक्षसुद्धा यात अडकून पडली आहेत. या समस्येमुळे भारतीय शेअर बाजार काहीशे अंकांनी खाली गेला, तर भारतात इंधनाच्या किमती या 4 % इतक्या वाढल्या आहेत. आणि हे सगळं एक अजस्त्र जहाज अडकून पडल्यामुळे होत आहे. तज्ञांच्या नुसार प्लॅन बी म्हणजे जर सहजासहजी टग बोटींनी हे जहाज निघालं नाही तर मग मोठमोठ्या क्रेन्स आणून यावरचे कंटेनर्स काढावे लागतील. या जहाजावर 20000 कंटेनर्स आहेत. हा प्लॅन सोपा नाहीये. पण हाच एकमेव पर्याय आत्तातरी दिसतो आहे. काही आठवडे तरी जागतिक व्यापारावर याचा परिणाम होणार आहे. आणि हे कंटेनर्स जरी काढून जहाजाचं वजन कमी करायचे ठरवले तरीही त्यातसुद्धा काही आठवडे लागतील असं सगळं गणित आहे. येत्या काही दिवसात याबद्दल चित्र स्पष्ट होईल त्याची आपण वाट पाहुयात. 

-निखिल कासखेडीकर  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...

अमेरिकेत जवळपास ५० वर्षानंतर झाली UFO संदर्भात बैठक!

  अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात... म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO ... म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तु! अश्या वस्तु ज्याचं मूळ बाहेरचं आहे असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं. अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अश्या विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP , म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यन्त जवळपास १४० अश्या केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलटसन...

फार्क (FARC) रुपी तलवार म्यान !

कोलंबिया म्हणजे जगविख्यात लेखक नोबेल विजेते गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांची भूमी! जशी ही थोर साहित्यिकांची, लेखकांची भूमी तशीच ही Farc (रिव्हॉलुशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या डाव्या क्रांतिकारी संघटनेची पण आद्य भूमी. या क्रांतिकारी गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गट काही डाव्या क्रांतिकारी विचारवंतांचा गट नाही. स्थापनेपासूनच या गटात विचारवंत नाही तर सामान्य गरीब शेतकरी सामील झालेले होते. या गटाची निर्मिती साम्राज्यवादाला विरोध आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे महत्व आणि वर्चस्व मान्य असणे या दोन मुलभूत घटकांवर झाली. साधारणतः अनेक डाव्या क्रांतिकारी चळवळी आणि गटांप्रामाणे या Farc चाही भर स्वतःची सैनिकी फौज असण्यामध्ये होता. १९६४ पासून हा गट कार्यरत झाला. पण दुर्भाग्य म्हणजे या गटाची मदार ही अपहरण करणे आणि खंडणी मिळवणे तसेच ड्रग्सचे स्मगलिंग करणे यांवर होती. पण नुकत्याच कोलंबियन सरकार आणि Farc नेत्यांमध्ये झालेल्या करारामुळे साधारणतः ५० वर्षे चाललेला सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अजून सार्वमत घेऊन ह्या कराराला अंतिम मान्यता मिळणे बाकी आह...