मुख्य सामग्रीवर वगळा

श्रीलंका आर्थिक गर्तेच्या छायेत...?

 भाग-१

कोरोना जागतिक महामारीने आज संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. या प्रादुर्भावाचा परिणाम हा जागतिक अर्थव्यवस्थेवरसुद्धा खूप प्रमाणात झाला आहे. याला कुठलाही देश अपवाद नाही. याचा सगळ्यात मोठा फटका जागतिक पर्यटन क्षेत्राला बसला आहे. अश्याच आर्थिक संकटात सापडलेला देश म्हणजे भारताचा शेजारी ... श्रीलंका! श्रीलंकेची अर्थव्यवस्था हळूहळू कोसळू लागली आहे. कोविड महामारी आल्याने अंदाजे पाच लाख लोक दारिद्र्यरेषेच्या खाली गेले आहेत. श्रीलंकेची अर्थव्यवस्था पाच वर्ष मागे फेकल्या गेल्यासारखी झाली आहे. तसच श्रीलंकेवर २६ बिलियन डॉलर इतकं परकीय कर्ज डोक्यावर आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था २०२१ मध्ये दीड टक्क्याने आकुंचीत पावली आहे.

श्रीलंकेच्या डोक्यावर चीनचं ५ बिलियन डॉलर कर्ज आहे. श्रीलंका हा चीनच्या कर्ज सापळ्यात अडकून पडला आहे अशी परिस्थिति आहे. याचप्रमाणे श्रीलंकन सरकारनुसार श्रीलंका एकूण तीन देशांना देणं लागतं – हे तीन देश म्हणजे चीन, जपान आणि भारत. परकीय गंगाजळी सुद्धा खूप घसरली आहे.

श्रीलंकेत पर्यटन क्षेत्राचा एकूण जिडीपी मधला वाटा हा १० टक्के इतका आहे. साहजिकच पर्यटनामुळे जे परकीय चलन पर्यटकांकडून मिळत होतं, ते तर जवळपास बंदच झालं आहे. वर्ल्ड ट्राव्हल अँड टुरिझम कौन्सिल या संस्थेच्या अहवालनुसार श्रीलंकेतल्या पर्यटन क्षेत्रामध्ये २ लाख लोकांनी आपले रोजगार गमावले आहेत.

अन्न धान्याची परिस्थिती पण अशी तशीच आहे. या सगळ्या गोष्टींचा फटका सामान्य  श्रीलंकन माणसाला बसला आहे. एकीकडे नोकर्‍या जात आहेत तर दुसरीकडे अन्न धान्य, वस्तु खरेदीसाठी सुद्धा लोकांना झगडावं लागत आहे. आर्थिक स्थिति चांगली असणार्‍या मध्यम वर्गालाही याचा फटका बसला आहे. लोक आता दिवसाला ठरवून घेतलेले अन्नचं तेवढं खात आहेत, म्हणजे अन्नाचं रेशनिंग केलं आहे. चलनवाढ झाली आहे. जे लोक दिवसातून ३ वेळा अन्न खायचे ते आता दोनच वेळा अन्न खाणार आहेत.  

खरं तर या सगळ्या नकारात्मक गोष्टींची यादी खूपच मोठी आहे. काही गोष्टींचा उल्लेख करणं इथे आवश्यक आहे. म्हणजे यावरून आपल्याला श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल कळेल. काही चमत्कारिक गोष्टी घडत आहेत याचा आपल्याला अंदाज येईल. श्रीलंका ईराण कडून तेल विकत घेतं. आता अर्थव्यवस्थेमधला रोख पैसा परकीय देणी देण्यात खर्च होऊ नये म्हणून श्रीलंका सरकार ईराणला दर महिन्याला पैसे देण्याएवजी ५ मिलियन डॉलर इतक्या किमतीचा चहा देणार आहे... थोडक्यात पैसे देण्याऐवजी, तेलाच्या बदल्यात चहा असा सगळा सौदा ठरला आहे. अशीच दुसरी चमत्कारिक आणि दु:खद गोष्ट म्हणजे लोकांना आता अन्न विकत घेणं सुद्धा बिकट झालं आहे. शहरांमध्ये ही परिस्थिति आहे. तर गावांमध्ये हालच आहेत. खेडेगावांमध्ये तर दुकांदाराकडून १ किलो दूध पावडर घेणे सुद्धा सामान्य माणसाला कठीण झाले आहे, म्हणून दुकानदार १ किलो ऐवजी दूध पावडरचे १०० ग्रॉमचे अशी १० पाकीट करून विकत आहेत. याचं कारण सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर हे सगळं चाललेलं आहे. उद्याची शाश्वती नाही.

श्रीलंकन सरकारला कोण वाचवेल, कोण या आर्थिक गर्तेतून बाहेर काढेल हे चित्र अजूनही अस्पष्ट आहे. सरकारला आता आंतर्राष्ट्रीय नाणेंनिधीकडून मदत घेण्याची आवश्यकता आहे असं श्रीलंकेचे मंत्री सांगत आहेत. श्रीलंका सरकारने अर्थव्यवस्थेची चिंताजनक स्थिति पाहून लष्कराच्या हातात काही कामकाज दिले आहे. सरकारने सैन्यातल्या एका जनरल पदाच्या वरिष्ठ अधिकार्‍याकडे जीवनावश्यक वस्तु, अन्न धान्याचे वाटप करण्याची मोठी जबाबदारी दिली आहे... पण त्याचाही काही उपयोग होताना दिसत नाही...

श्रीलंकेला आर्थिक मदतीची गरज आहे आणि शेजारील राष्ट्र ती करतील अशी आशा आहे॰ आगामी काळात जर श्रीलंकेला पुरेशी आर्थिक मदत मिळाली नाही तर अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळेल अशी युद्धजन्य परिस्थिति आहे. आंतर्राष्ट्रीय नाणेंनिधी आणि आंतर्राष्ट्रीय समुदाय तसच सार्क देश यादृष्टीने काय पावलं उचलतात हे लवकरच कळेल.

                                   क्रमशः !

-निखिल कासखेडीकर 

(हा लेख https://kfacts.in/ या पोर्टलवर जानेवारी 2022 मध्ये प्रकाशित झाला आहे.)  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...

अमेरिकेत जवळपास ५० वर्षानंतर झाली UFO संदर्भात बैठक!

  अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात... म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO ... म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तु! अश्या वस्तु ज्याचं मूळ बाहेरचं आहे असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं. अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अश्या विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP , म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यन्त जवळपास १४० अश्या केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलटसन...

फार्क (FARC) रुपी तलवार म्यान !

कोलंबिया म्हणजे जगविख्यात लेखक नोबेल विजेते गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांची भूमी! जशी ही थोर साहित्यिकांची, लेखकांची भूमी तशीच ही Farc (रिव्हॉलुशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या डाव्या क्रांतिकारी संघटनेची पण आद्य भूमी. या क्रांतिकारी गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गट काही डाव्या क्रांतिकारी विचारवंतांचा गट नाही. स्थापनेपासूनच या गटात विचारवंत नाही तर सामान्य गरीब शेतकरी सामील झालेले होते. या गटाची निर्मिती साम्राज्यवादाला विरोध आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे महत्व आणि वर्चस्व मान्य असणे या दोन मुलभूत घटकांवर झाली. साधारणतः अनेक डाव्या क्रांतिकारी चळवळी आणि गटांप्रामाणे या Farc चाही भर स्वतःची सैनिकी फौज असण्यामध्ये होता. १९६४ पासून हा गट कार्यरत झाला. पण दुर्भाग्य म्हणजे या गटाची मदार ही अपहरण करणे आणि खंडणी मिळवणे तसेच ड्रग्सचे स्मगलिंग करणे यांवर होती. पण नुकत्याच कोलंबियन सरकार आणि Farc नेत्यांमध्ये झालेल्या करारामुळे साधारणतः ५० वर्षे चाललेला सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अजून सार्वमत घेऊन ह्या कराराला अंतिम मान्यता मिळणे बाकी आह...