जसं जसं तंत्रज्ञानात रोज बदल होत चालले आहेत, तसं तसं या तंत्रज्ञानाचा माणसाला फायदा होतो आहे, असं म्हणण्यास जागा आहे. कारण शेवटी माणसाचे जीवन सुकर करण्यासाठीच तंत्रज्ञानाचा उपयोग माणूस करत आहे. पण तंत्रज्ञानाचा अतिरेक पण होता कामा नये याचीसुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. पूर्वीपेक्षा आज माणसाला कुठल्याही प्रकारचे काम करण्यासाठी कमी कष्ट करावे लागत आहेत. आज वस्तूंचे उत्पादन करण्यात खुद्द माणसांबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्सचा सुद्धा सहभाग आहे. पण उद्या माणसे जाऊन फक्त मशीन्सच उत्पादन करू लागले तर काय असा प्रश्न आहे. कामगारांच्या नोकर्यांवर गदा येऊ नये, यासाठी काहीतरी उपाय योजना करणे आवश्यक आहे. इथे एक फरक लक्षात घेण्यासारखा आहे. माणसाला बुद्धी आहे, माणसाला भावना आहे, या दोन्ही गोष्टींचा उपयोग करून माणूस विशिष्ट निर्णय घेऊ शकतो. मशीन्सचा विचार करायचा झाल्यास त्यांना तांत्रिक भाषेत ज्या कमांड्स दिलेल्या असतात तेवढ्याचाच उपयोग करून मशीन्स आउटपुट देतात. म्हणजे निर्णयांती पोहोचतात. त्यांच्यात जी माहिती फीड केली जाते, तेवढे मग अनुसरण करून अंतिम वस्तू निर्मिली जाते. या मशीन्सना भावना नसतात. त्या असत्या तर काय ? आज जग वेगळे असते. खरं तर हा एक गहन अभ्यासाचा विषय आहे. नेमके हेच चित्रण Matrix या हॉलीवूडपटात केले आहे. त्यात तर पुढे मशीन्स माणसांवर राज्य करू लागतात असं दाखवलं आहे. असो तो वेगळा विषय आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करून माणसाचे आयुष्य सुकर करण्याचा एक प्रयत्न म्हणजे GPS! अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे नियंत्रण असलेली नेव्हिगेशन यंत्रणा म्हणजे GPS (Global Positioning System). अवकाशात अमेरिकेच्या एकूण २४ सॅटेलाइट्स पृथ्वीच्या अवतीभवती एका विशिष्ट पद्धतीने फिरत असतात. पण GPS चा नेमका फायदा काय? असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये चारचाकी वाहनांमध्ये सर्रास GPS चा वापर केला जातो. याद्वारे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोहोचायला हे GPSच मदत करते. मासेमारीसाठी समुद्रात उतरलेले मच्छीमार बांधव जर दिशा चुकले, तर GPS च्या मदतीने ते ज्या मूळ स्थळापासून निघाले आहेत, तिथे ते GPS यंत्र त्यांना आहे त्या मूळ ठिकाणी घेऊन जाण्यस मदत करेल. कुरियर सेवांसाठीसुद्धा GPS चा चांगला उपयोग होतो.
अमेरिका आणि युरोप मधले प्रत्येक चारचाकी वाहन
GPS वरच चालते. ही अतिशयोक्ती नाही, तर काळाची गरज आहे. अमेरिकेकडे GPS तंत्रज्ञान
उपलब्ध आहे. भारताने आपले स्वतःचे GPS तंत्रज्ञान- त्याला ‘नाविक’ म्हणतात -हे
विकसित केले आहे. जपान्सुद्धा यात अग्रेसर आहे. जपानला GPS साठी आधी अमेरिकेवर
अवलंबून राहावे लागायचे. पण GPS तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण होण्यासाठी जपानने २०१०
ला मिचीबिकी ही पहिली सॅटेलाइट अवकाशात सोडली. यातले पुढचे पाउल म्हणजे एक
आठवड्यापूर्वी जपानने H-2A रॉकेटच्या सहाय्याने दक्षिण जपानमधून मिचीबिकी २ ही
सॅटेलाइट अवकाशात सोडली. जपानचा अश्या एकूण सात सॅटेलाइटस अवकाशात सोडण्याचा मानस
आहे. या सात सॅटेलाइटस सोडल्यानंतर त्यातली एक सॅटेलाइट जपानवर आठ तास फिरेल, अशी
रचना केली गेली आहे. अर्थात ओर्बीटमध्ये एकूण सात सॅटेलाइटस सोडण्याचे काम २०२३
पर्यंत चालेल अशी जपानी सरकारची योजना आहे.
या सॅटेलाइटसचा उद्देशच मुळी स्मार्टफोन्स आणि
इतर नेव्हिगेशन यंत्रांमध्ये एखादी जागा शोधण्यासाठी वापर करणे हा आहे. याचबरोबर
या सॅटेलाइटसचा मुख्य उद्देश शेतीकामांसाठी चालकरहित ट्रॅक्टर आणि बांधकामासाठी
स्वयंचलित मशीन्स यांच्यामध्ये वापरणाऱ्या तंत्रज्ञानासाठी उपयोग करणे आहे.
क्वासी झेनिथ सॅटेलाइट सिस्टीमच्या अंतर्गत
मिचीबिकी सॅटेलाइट सोडण्याचे नियोजन जपानी सरकारने केले आहे. जपानी भाषेत याला
‘ज्युन्तेन्चो’ असं म्हटलं गेले आहे. या प्रकल्पात खाजगी कंपन्यांचा सुद्धा सहभाग
लक्षणीय आहे.
उगवत्या सूर्याचा देश म्हणजे जपान! अशी ओळख
असलेल्या देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञानात बरीच प्रगती केली असली तरीही त्यांच्याकडे
त्यांचे स्वतःचे असे GPS तंत्रज्ञान नव्हते. त्यांना यासाठी अमेरिकेवर अवलंबून
राहावे लागायचे. पण या प्रकल्पामुळे आता जपानला कोणावर अवलंबून राहावे लागणार
नाही.
दुसऱ्या महायुद्धानंतर उध्वस्त झालेल्या जपानने परत
आपल्या पायांवर उभं राहण्यासाठी बरेच प्रयत्न केले. विज्ञानाची कास धरली. ’६० च्या
दशकात जपानने अमेरिकेच्या वाहन उद्योगाला
मागे टाकले. इतके कि जपानी मोटर्स अमेरिका जपानकडून आयात करू लागली. मजबूत
अर्थव्यवस्था आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या जोरावर जगात आपले वर्चस्व प्रस्थापित
केले. हे सगळे शक्य झाले ते सामान्य जपानी नागरिकाच्या मेहनतीच्या जोरावर. त्याचेच
दर्शन आपल्याला आता मिचीबिकी सॅटेलाइट च्या माध्यमातून मिळणार आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा