मुख्य सामग्रीवर वगळा

गाम्बियाची लोकशाहीकडे वाटचाल!

गाम्बिया एक आकारमानाने छोटासा पश्चिम अफ्रिकन देश. उत्तर, पूर्व आणि दक्षिण बाजूंनी सेनेगल या देशाने वेढलेला आणि पश्चिमेला अटलांटिक महासागराचा किनारा. गाम्बियाबद्दल तसं आज बोलायचं कारण म्हणजे गाम्बियाची लोकशाहीकडे सुरु असलेली वाटचाल. गाम्बियाचं अधिकृत नांव इस्लामिक रिपब्लिक ऑफ गाम्बिया! तसं ते झालं २०१५ साली.



साधारणतः अफ्रिकन देशांमध्ये एकाधिकारशाही रुजलेली आहे. यादवीचा सगळ्या अफ्रिकन देशांना जणू शापच आहे. त्यात कहर म्हणजे सैनिकी हुकुमशाहीचे अस्तित्व! जोडीला कमालीचे दारिद्र्य, अविकसितता, हलाखीचे जीवन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दहाही दिशांना गुलामगिरीचा काळा इतिहास. हे सगळं असं आयुष्य जगणं म्हणजे कठीणच.

एकूणच अफ्रिका खंडातले देश मागासलेले आहेत. आर्थिक विकास कुठेच झाला नाही. आर्थिक विकास झाला नसल्यामुळे हुकुमशाहांचे फावले. सैनिकी बळावर सत्ता काबीज करणे आणि सामान्य जनतेला दारिद्र्यात ठेवणे अशी ही हुकुमशाहीची तेवढीच काय ती देणगी! विकसित राष्ट्रांकडून मोठ्या प्रमाणावर मदत घायची आणि ती सगळी मदत सामान्य जनतेला वेठीस धरण्यासाठी शस्त्रास्त्रांच्या रुपात वापरायची. हे ह्यांचे उद्योग! पण जनता-जनार्दन हे मूर्ख आणि बावळट नक्कीच नाही. प्रत्येक गोष्टीची सीमा ओलांडल्यानंतर मग उद्रेक होऊन त्या गोष्टीचं एका नवीन प्रकारात रुपांतर होतं. तसं गाम्बियाचं झालं. २२ वर्ष हुकुमशाही अनुभवल्या नंतर, आता गाम्बिया लोकशाहीकडे वाटचाल करतो आहे. याह्या जामेह याच्या हुकुमशाहीला कंटाळून शेवटी संवैधानिक मार्गाने रीतसर निवडणुका घेऊन, गाम्बियात लोकशाहीचा विजय झाला. अडामा बॅरो हे निवडणुकांमध्ये विजयी होऊन राष्ट्रपतीपदावर विराजमान झाले आहेत.

अगदी सुरवातीला गाम्बियावर अरब टोळ्यांचं राज्य होतं, त्यानंतर सोळाव्या शतकात पोर्तुगीजांचं राज्य आलं. नंतर त्यावर कमी म्हणून कि काय ब्रिटन ने राज्य केलं. आणि शेवटी १९६५ ला गाम्बियाला ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळालं. मग सुरवातीचे काही दिवस झाल्यानंतर सार्वमत घेऊन गाम्बियाला प्रजासत्ताक घोषित करण्यात आलं. या सुरवातीच्या काळात दावडा जवारा यांच्याकडे पंतप्रधानपद आणि राष्ट्रपतीपद ही दोन्ही पदे आली. त्यानंतर म्हणजे १९९४ साली सैनिकी क्रांती होऊन याह्या जामेह याने सत्ता काबीज केली. ही सत्ता, जामेह याने अगदी आतापर्यंत म्हणजे २०१६ पर्यंत टिकवली होती. पण निवडणुकांमध्ये  हरल्याने त्याने देश सोडून जाण्याचे मान्य केलं आणि नवनिर्वाचित राष्ट्रपती बॅरो यांच्याकडे सत्ता सुपूर्त करण्याचे ठरवलं. अजून ह्या उपर कडी म्हणून कि काय मी परत येईन असं जाता जाता तो सांगतो आहे.

गाम्बियात ९० % जनता धर्माने मुस्लीम आहे, बाकी ख्रिश्चन आणि उरलेले इतर धर्मीय आहेत. २०१५ साली जामेह याने रिपब्लिक ऑफ गाम्बिया हा इस्लामिक रिपब्लिक ऑफ गाम्बिया करून टाकला.

गाम्बियाच्या फ्रीडम वृत्तपत्र या ऑनलाईन वृत्तपत्राने याह्या जामेह याला राक्षस तर त्याची  बायको झैनाब हिला दुष्ट म्हटले आहे. या वृत्तपत्राने एक विशेष टिप्पणी केली आहे आणि ती फार महत्वाची आहे. त्यात असं म्हंटल अही कि एकेकाळी हा हुकुमशाह आपल्या बांधवाना दुसऱ्या देशात हाकलायचा आणि त्यांना निर्वासित करायचा आज त्याच्यावर दुसऱ्या देशात जाऊन राहायची वेळ आली आहे, तो निर्वासित झाला आहे. गिनी देशाच्या राष्ट्रपतीने त्याच्या आणि त्याच्या नातेवाईकांकर्ता एक स्वतंत्र व्हिला देण्याचे नियोजित केले आहे. यात सगळ्यात म्हणजे जामेह्ला अजूनही आशा आहे कि आंतरराष्ट्रीय समुदाय गाम्बियात आलेली लोकशाही उधळून लावून आपल्याला परत राष्ट्रपतीपदावर विराजमान करेल.

अफ्रिकन देशांमध्ये कमालीची गरिबी असल्यामुळे तिथे विकास करणे आवश्यक आहे. मानवतावादी दृष्टीकोनातून आर्थिक नियोजन करणे ही गरज आहे. पण विकसित देशांना हुकुमशाहीच अफ्रिकेमध्ये प्रस्थापित करण्यातच स्वारस्य आहे. म्हणूनच इतके वर्ष हा प्रदेश मागासलेला राहिला. चीनला अफ्रिकेमध्ये गुंतवणूक करण्यात रस आहे, कारण जिथे अमेरिका नाही तिथे चीन आहे, हे वचन चीन खरं करायला निघालेला आहे. चीनची गुंतवणूक अफ्रिकन देशांमध्ये आधीच झालेली आहे. पण चीनचं रेकॉर्ड अफ्रिकन देशांच्या बाबतीत चांगलं नाही. चीनला फक्त स्वतःचे खिसे भरण्यात रस असून अफ्रिकेचा विकास करण्याचा त्यांचा हेतू नाही, हे ब-याच वेळेला सिद्ध झालं आहे. याचं कारण आहे अफ्रिकेकडे असलेली प्रचंड नैसर्गिक साधन संपत्ती.

भारताचे अफ्रिकन खंडातल्या देशांबरोबर फारच चांगले संबंध राहिले आहेत. यात उल्लेख करावा म्हणजे महात्मा गांधी आणि दक्षिण अफ्रिका यांचं नातं. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर नुसते संबंध चांगले राहून चालत नाही. दूरदृष्टी ठेवून अफ्रिकन देशांमध्ये आपण भरपूर आर्थिक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यामध्ये गाम्बिया सारख्या देशांचा समावेश होऊ शकतो. याचं कारण म्हणजे गाम्बियात नुकतीच आलेली लोकशाही व्यवस्था. जर शाश्वत विकास साधायचा असेल तर आपण अफ्रिकन देशांमध्ये लोकशाही यायला त्या देशांना प्रवृत्त केलं पाहिजे. किंवा ज्या देशांमध्ये लोकशाही आली आहे किंवा आधीपासून आहे, अश्या देशांबरोबर व्यापार वाढवणे आवश्यक आहे. आपल्याकडे पुरेसे मनुष्यबळ आहे. त्याचा जर चांगला उपयोग करता आला आणि त्या जोडीला गुंतवणूक जर झाली तर आपल्याला सामरिक दृष्ट्याही त्याचा उपयोग होईल.

शेवटी, गाम्बियाची लोकशाहीकडे वाटचाल सुरु झालेली आहे, त्यात जर आपल्याला ठोस भूमिका बजावता आली तर उत्तमंच. गाम्बियात लोकशाही वाढेल आणि टिकून राहील अशी आशा करूयात. इतकंच!

-निखील कासखेडीकर 



टिप्पण्या