मुख्य सामग्रीवर वगळा

पाकिस्तान अमेरिका संबंध... दुरावलेलेच!

दोन सच्च्या मित्रांची जशी मैत्री असते तशीच किंवा अगदी त्याहून ज्यास्त मैत्री पाकिस्तानची अमेरिकेबरोबर होती. इथे होती असं म्हणण्याचं कारण म्हणजे पाकिस्तान अमेरिका संबंध २०११ पासून तणावपूर्ण आहेत. याला काही आंतरराष्ट्रीय तसेच काही प्रादेशिक कारणं देखील आहेत.

पाकिस्तान अमेरिका संबंध – पार्श्वभूमी

वास्तविक पाहता अमेरिका हा काही निवडक देशांपैकी एक देश होता, ज्याने पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित झाल्यानंतर त्याला मान्यता दिली. पाकिस्तान बरोबर अमेरिकेचे संबंध पुढील काळात वृद्धिंगत होत गेले. पाकिस्तानमधल्या पाकिस्तान मुस्लीम लीग या पक्षाच्या अमेरिका धार्जिण्या धोरणामुळे अमेरिका आणि पाकिस्तान या दोन देशांमधले संबंध सुदृढ झाले. याला पाकिस्तान मुस्लीम लीगचे भांडवलवादी धोरण मुख्यत्वेकरून कारणीभूत ठरले.



शीतयुद्ध सुरु झाल्यापासून ते संपेपर्यंत अमेरिकेला पाकिस्तानची सोबत होती. सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानमध्ये मोर्चा प्रस्थापित केला. आपले सैन्य पाठवले. इकडे अमेरिका जागी झाली. अमेरिकेला पाकिस्तानबद्दल चिंता वाटू लागली. जर सोव्हियेत रशियाने पाकिस्तानमध्ये सैन्य घुसवले आणि हल्ला केला तर काय करायचं? हा प्रश्न सतत अमेरिकेच्या डोळ्यासमोर होता. यामुळे अमेरिकेचा पाकिस्तानला मिळणारा पाठिंबा अजूनच वाढला. पण त्या आधीचा काळ हा पाकिस्तान अमेरिका संबंधांची परीक्षा पाहणारा ठरला. १९६५  साली जेंव्हा भारताबरोबर झालेल्या युद्धात पाकिस्तान हरला, त्यावेळी अमेरिकेने पाकिस्तानवर शस्त्रास्त्र निर्बंध लादले. याचे कारण फारच विचित्र होते. अमेरिकेने दिलेली शस्त्रास्त्रे पाकिस्तानी सैनिकांना युद्धात नीट वापरता आली नाहीत आणि म्हणून निर्बंध लादले, असं कारण अमेरिकेने दिले.

पुढे म्हणजे १९७९ साली अमेरिकच्या सी. आय. ए. ला खात्रीशीर समजले कि, पाकिस्तान आण्विक कार्यक्रम हाती घेतो आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर अमेरिकेच्या कार्टर प्रशासनाने ‘सिमिंगटन अमेंडमेंट’ लागू केले. या अमेंडमेंट नुसार पाकिस्तानला अमेरिकेकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत मिळण्यापासून रोखलं गेलं. यातच १९८५ साली अमेरिकी सभागृहात ‘प्रेसलर अमेंडमेंट’ पारित करण्यात आलं. यानुसार सैल सुटलेल्या पाकिस्तानने अमेरिकेकडून मिळणारी आर्थिक मदत आण्विक कार्यक्रम चालू ठेवण्यासाठी वापरू नये यासाठी अनेक कलमं अंतर्भूत करण्यात आली. इथे पाकिस्तान अमेरका संबंध ताणले गेले.



पण शीतयुद्धाच्या काळात आणि २००१ सालानंतर पाकिस्तान अमेरिकेच्या अजून जवळ आला. शीतयुद्धात सोव्हिएत रशियाविरुद्ध अमेरिकेने पाकिस्तानला पाठींबा दिला. २००१ ला वर्ल्ड ट्रेड सेंटर वर हल्ला झाल्यानंतर अमेरिकी अध्यक्ष धाकट्या बुश साहेबांनी ‘वॉर ऑन टेरर’ घोषित केल्यानंतर अमेरिकेला अल कायदाचे तळ उध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानची मदत खूपच आवश्यक वाटली. यानंतर जसे जसे पाकिस्तानला अमेरिकी अर्थसहाय्य झाले तसे तसे ती मदत पाकिस्तानने भारताविरोधात वापरली.

२०११ नंतरचे पाकिस्तान अमेरिका संबंध -

२०१० चे दशक पाकिस्तान अमेरिका संबंधांसाठी संमिश्र गेलं. या दोन देशांच्या संबंधांना २०११ पासून उतरती कळा लागली ती आजतागायत चालू आहे. २०११ साली पाकिस्तान अमेरिका संबंधाना प्रतिकूल ठरणाऱ्या तीन घटना घडल्या. एक म्हणजे पाकिस्तानातल्या अबोटाबाद इथे अमेरिकेच्या नेव्ही सील्सने ओसामा बिन लादेनचा त्याच्याच घरात शिरून खात्मा केला. या ऑपरेशनला नाव देण्यात आले, ‘ऑपरेशन नेपच्यून स्पियर’! यात अमेरिकी नौदलाच्या सिल्सनी चार हेलीकॉप्टर सकट ओसामाच्या घराच्या कंपाऊंड मध्ये उतरून त्याच्यावर हल्ला चढवला. ही कारवाई इतक्या गुप्तपद्धतीने करण्यात आली की ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतरसुद्धा पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना याची माहिती नव्हती. अबोटाबाद पासून जवळच पाकिस्तानचा एक हवाई दलाचा तळ आहे, तिथेसुद्धा या कारवाईचा थांगपत्ता लागला नाही, असे पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांत कटुता आली. दुसरी घटना घडली, ती म्हणजे रेमंड डेव्हीस या अमेरिकेच्या सैनिकाने पाकिस्तानात दोन शस्त्रधारी लोकांना ठार मारले. त्याच्यावर मनुष्यवधाचा खटला चालला आणि त्यातून तो निर्दोष सुटला. तिसरी घटना होती, नाटोच्या सैनिकांनी अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमारेषेनजिक पाकिस्तानी सैनिकांवर केलेल्या हल्ल्याची. ही घटना ‘सलाला इंसिडंट’ म्हणून ओळखली जाते. अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमारेषे नजिक पाकिस्तानचे दोन चेकपोस्ट होते, त्यावर नाटोच्या सैनिकांनी हल्ला चढवला. यात हेलीकॉप्टर्स सुद्धा वापरली गेली. या हल्ल्यात पाकिस्तानचे २८ सैनिक ठार झाले. या तीन घटनांनी पाकिस्तान अमेरिका संबंधांमध्ये खूपच दुरावा आला.

सध्या अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मॅटीस पाकीस्तान दौऱ्यावर आले आहेत. पाकिस्तानने जे दहशतवादी त्यांच्या देशाची भूमी अफगाणिस्तानमध्ये हल्ल्यासाठी वापरात आहेत अशांचा बंदोबस्त करावा यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे, हे सांगण्यासाठी मॅटीस पाकिस्तानात आले आहेत अशी बातमी रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे. नुकतच सी. आय. ए. प्रमुख माईक पाम्पेओ यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक विधान केले. ते म्हणाले, पाकिस्तानने त्वरित जे दहशतवादी पाकिस्तानी जमीन वापरून शेजारच्या अफगाणिस्तानमध्ये हल्ले करत आहेत, त्यांना पाकिस्तानने पायबंद घालावा, असे न केल्यास अमेरिका अश्या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतः पाकिस्तानात घुसुन कारवाई करेल आणि त्यांचे तळ उध्वस्त करेल. खरे तर हा इशाराच आहे पाकिस्तानला.

ट्रम्प प्रशासन, पाकिस्तान आणि भविष्य-

डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर, पाकिस्तानविरोधात ट्रम्प प्रशासनाने जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे. याला भारत अमेरिका संबंध दृढ होण्याची पार्श्वभूमीसुद्धा आहे. ट्रम्प आणि मोदी यांची मैत्री भारत अमेरिका संबंधाना बळकटी देणारी असल्यामुळे, पाकिस्तान चिंतेत आहे. नुकताच हाफिज सईदची पुराव्या अभावी नजरकैदेतून मुक्तता झाल्यानंतर भारताने त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच अमेरिकेने पाकिस्तानला दम भरला आणि नाराजी व्यक्त केली. याचा दबाव म्हणून की काय पाकिस्तानने हाफिज सईदला पुन्हा नजरकैदेत ठेवले आहे. मुंबईत झालेल्या २६ नोव्हेंबर २००८ सालच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून हाफिज सईदचे नाव घेतले जाते.



एकूणच पाकिस्तान अमेरिका संबंध पूर्वी बहरले जरी असले तरीसुद्धा आता मात्र अमेरिकेचा विश्वास पाकिस्तान गमावून बसला आहे, अशी परीस्थिती आहे. अगदी पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून केवळ भारताविरुद्ध पूर्वग्रहदुषित दृष्टीकोण आणि सोव्हिएत रशियाचा हस्तक म्हणून अमेरिकेने भारताची आतापर्यंत हेटाळणी केली. यात भारताला आणि पाकिस्तानला समान वागणूक देण्याचे अमेरिकेचे धोरण सुद्धा भारताबरोबर संबंधांमध्ये कटुता येण्याचे कारण होते. भारताने वारंवार पाकिस्तानच्या कुरापत्यांबद्दल सांगूनसुद्धा अमेरिकेने पाकिस्तानलाच मित्र मानले. मात्र अलीकडच्या काळात या धोरणात बदल झाला. जसा जसा भारत अमेरिकेच्या जवळ गेला तसा तसा पाकिस्तान अमेरिकेच्या दूर गेला आहे. ही आजची स्थिती आहे. येणाऱ्या काळात पाकिस्तान अमेरिका संबंध सुधारतील आणि अमेरिका पाकिस्तानला भारताविरुद्ध हल्ले करण्यापासून रोखेल अशी अपेक्षाच तेवढी आहे. पाकिस्तानने योग्य धडा घेतला तर ठीकच, अन्यथा पाकिस्तानविरोधात अमेरिका आक्रमक धोरण राबवील असा अंदाज आहे. पाकिस्तान अमेरिका संबंध सुधरवण्यासाठी ट्रम्प प्रशासन काय पावलं उचलते ते येणारा काळच सांगेल. पण असं जरी असलं तरीसुद्धा दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेचा गमावलेला विश्वास परत आणण्यासाठी धाडसी निर्णय घेणे आवश्यक आहे.

-निखील कासखेडीकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नासाने घडवला इतिहास... या देशातल्या व्यावसायिक स्पेसपोर्ट वरुन प्रथमच प्रक्षेपित केलं रॉकेट.

  नासा ... अर्थात अमेरिकेची अंतराळ संस्था! तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिका जगातल्या इतर देशांपेक्षा खूपच पुढे आहे. आणि म्हणूनच ती महासत्ता आहे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेची अवकाश संस्था नासा... १९५८ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जनरल ड्वाईट   आयसेनहोवर यांनी नासाची स्थापना केली. हे शितयुद्धाचे दिवस होते.   जगाची विभागणी दोन सत्ताकेंद्रांमद्धे झाली होती. एक सत्ताकेंद्र होतं: सोव्हिएत महासंघ तर दुसरं केंद्र होतं अमेरिका. दोन्हीही सत्तानमद्धे छुपं युद्ध सुरू होतं. म्हणजे या दोन सत्ता एकमेकांशी थेट न लढता त्यांच्या त्यांच्या मित्र राष्ट्राना पुढे करून एकमेकांशी संघर्ष करत होत्या. यातच दोन्ही देशांमधली अंतराळ स्पर्धा शिगेला पोहोचली होती. कोण श्रेष्ठ? अमेरिका की रशिया हीच चढाओढ लागली होती. अंतराळ स्पर्धेच्या निमित्ताने नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून दोन्हीही देशांना वरचढ व्हायचं   होतं. याला अनुसरून अगदी दीर्घ काळासाठी नासाने योजना आखल्या. कल्पनाही न करता येऊ शकणारे मिशन्स पूर्णत्वास नेले. ९० च्या दशकात सोव्हिएत महासंघाचं पतन झाल्यानंतर मात्र जगाची सूत्र अमेरिकेक...

हा ज्वालामुखी इतका जोरात भडकला की अवकाशातूनसुद्धा तो दिसला!

  ‘ टोंगा ’ हे प्रशांत महासागरातलं एक छोटं द्वीपकल्प असलेलं राज्य. प्रशांत महासागरामधल्या या छोट्या बेटांचे अनेक समूह आहेत काहीतर स्वतंत्र राज्ये आहेत. प्रशांत महासागरातल्या बेटांची साधारणतः तीन गटात विभागणी केली जाते. मायक्रोनेशिया , मेलनेशिया आणि पॉलिनेशिया! तर पॉलिनेशिया या भागात टोंगा वसलेलं आहे. या राज्यावर पूर्वी ब्रिटिशांची सत्ता होती , १९७० पर्यन्त... त्यानंतर मात्र टोंगा या देशाचा प्रवास हा लोकशाही मार्गाने रीतसर संविधान ठरवून आणि निवडणुका घेऊन सुरू झाला ... हे घडलं २०१० नंतर. तसं या देशाबद्दल बोलण्याची वेळ कधी आली नाही कारण विशेष असं सांगण्यासारखं १५ जानेवारी २०२२ पर्यन्त असं काही नव्हतं. पण १५ जानेवारीला टोंगा बेटसमुहांच्या राज्यामध्ये असलेल्या या भागात महासागरातल्या पाण्याच्या खाली असलेल्या ‘ हुंगा टोंगा हुंगा हापाई ’ या एका शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट झाला आणि सार्‍या जगाला टोंगा हे नाव माहीत झालं. या स्फोटाचं उगमस्थान साधारण पाचशे फुट खाली होतं , असं सांगण्यात आलं. स्फोट झाल्यानंतर टोंगा बेटांच्या समुहावर त्याचा परिणाम झाला. हवेत राख पसरली... पाण्याने प्रदेश व्य...

सगळे आर्थिक गुन्हेगार/ फ्रॉड लोक लंडनलाच का पळून जातात?

  मित्रांनो आपण सगळे वर्तमानपत्रात वाचतो किंवा आजकाल तर टीव्ही वर बातम्या बघताना पहात असतो की विजय मल्ल्या किंवा नीरव मोदींसारखे फ्रॉड लोक भारतात गुन्हे करतात आणि जेंव्हा सरकारला समजतं की यांनी गुन्हे केले आहेत , तेंव्हा ते सरकारी कारवाई होण्याच्या आधीच भारतातून केंव्हाच पसार झाले असतात. बरं हे सगळे जातात कुठे ? तर देश सोडून पळून जातात. आणि मग त्यातल्या त्यात कुठे तर ब्रिटनला पळून जातात म्हणजेच लंडनला जातात. यावरून आपल्यासारख्या सामान्य लोकांना प्रश्न पडू शकतो की , खरंच काय आहे लंडनमध्ये ? काय आहे ब्रिटन मध्ये ? फ्रॉड लोकांना लंडनचा आसरा घेण्यासारखं काय आहे तिथे ? बरं अपराधी अपराध करून पळून जातो , मग हे सगळे आरोपी लंडन गाठतात इथपर्यंत ठीक आहे , पण मग त्यांना तपासासाठी , चौकशीसाठी , कारवाईसाठी परत भारतात आणण्याकरता एवढा खटाटोप का करावा लागतो ? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रॉड करणार्‍या लोकांना भारतात आणणं केवळ अशक्य कोटीचं काम आहे हे समजतं...हे असं का होतं ? ... तर मित्रांनो सगळी गम्मत आहे... आपण याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजावून घेऊ ! जेंव्हा एका देशातून गुन्...