मुख्य सामग्रीवर वगळा

व्हेनेझुएला संकटात!

व्हेनेझुएला हे लॅटिन अमेरिकन राष्ट्र! तेलसंपन्न असणा-या या राष्ट्रात एकेकाळी परकीय गंगाजळी भरभरून वहायची. शिवाय संयुक्त राष्ट्रांच्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स अंतर्गत व्हेनेझुएलाला विकास करण्याची संधी मिळाली. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मिळणा-या कर्जांवर आणि तेलातून मिळणा-या उत्पन्नावर या देशाचं आर्थिक रहाटगाडगं आतापर्यंत चालू होतं. पण समाजवादाचा आत्यंतिक अतिरेक आणि भांडवलशाहीची गळचेपी या दोन कारणांमुळे आज देशावर भीषण परिस्थिती ओढवली आहे आणि त्यात कहर म्हणजे सद्य सरकारच्या गैर- व्यवस्थापनामुळे अर्थव्यवस्था पार मोडकळीस आली आहे. व्हेनेझुएलावर एवढी भयाण परिस्थिती का ओढवली यासाठी थोडा मागचा इतिहास तपासावा लागेल.



बोलीव्हारीयान क्रांती यशस्वी झाल्यानंतर, सत्ता काबीज करण्यामागे लागलेले ह्युगो चावेझ १९९८ ला पहिल्यांदा राष्ट्रपती झाले. त्यानंतर अगदी त्यांच्या मृत्युपर्यंत म्हणजे २०१३ पर्यंत ते राष्ट्रपती पदावर राहिले. त्यांच्या विरुध्द या काळात काही वेळा बंड पुकारले गेले, पण त्यांनी ते सपशेल मोडून काढून आपली सद्दी कायम ठेवली. सत्तेत असताना त्यांची आर्थिक धोरणे विकासाभिमुख म्हणता येतील अशी नव्हती. “मला भांडवलशाही मोडीत काढायची आहे” असा अनेकवेळा ते फुत्कार काढायचे. समाजवाद जणू त्यांच्या डोक्यावर आरूढ झाल्याप्रमाणे त्यांनी अनेक वेळा चुकीची पावले उचलली. खाजगी उद्योगांवर त्यांची विशेष नजर होती. खाजगी उद्योगांचे राष्ट्रीयीकरण हा त्यांचा आवडता छंद होता. १२०० खाजगी कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केले. एवढे मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीयीकरण कुठल्याच नेत्याने आपापल्या  देशात केले नसेल. एकसंध आणि समानता असणा-या समाजाची निर्मिती असल्या भलत्याच गोष्टी करून होत नसते, हे ते जाणत नसावे बहुतेक. या महाशयांनी अनेक कल्याणकारी योजना आणल्याचा दावा केला. तरुणांना स्कॉलरशिप, गरजूंना घरे आणि गरीब मातांना मोठ्या प्रमाणावर सबसिडी असा आदर्श (?) कार्यक्रम त्यांनी हाती घेतला होता म्हणे. समाजवादाचे इमले बांधायचे आणि आम्ही कसे आदर्श समाजाची रचना करत आहोत असा अविर्भाव आणायचा, पण समाजवाद अंगीकारण्यासाठी सरकारी योजना आणाव्या लागतात, त्यांच्यावर खर्च करावा लागतो, त्यासाठी सरकारचे उत्पन्न असावे लागते, त्यासाठी कर आकारावा लागतो, त्यासाठी तशी व्यवस्था लागते आणि याउपर, म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागतो, हे ह्यांना कधी उमगणार? मुळात पैसा नावाची चीजच भांडवलशाही आहे, हे ते कदाचित विसरले असावेत.

मूळ मुद्याकडे यायचे म्हणजे ह्युगो चावेझ यांनी अर्थव्यवस्था पुरेशी खिळखिळी केल्यानंतर त्यांच्या पक्ष्यातल्या लोकांनी गप्प बसावं ना! पण २०१३ ला ह्युगो चावेझ गेल्यानंतर आलेल्या सत्पुरुषाने अजून उरलेले पुण्यकर्म आटपून अर्थव्यवस्थेचे पुरते बारा वाजवले. निकोलस माडूरो यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर, उलट त्यांनी अर्थव्यवस्थेची घडी नीट बसवण्यासाठी पुरेसे प्रयत्न करणे गरजेचे होते, पण ते न करताच त्यांनी आपल्या पक्षातील लोकांचे, समर्थकांचे आणि आपल्या नातेवाईकांचे पोट भरण्याचे, तसेच ड्रग स्मगलिंग करून  विविध गुण उधळले.

व्हेनेझुएलात आज ७००% चलनवाढ झाली आहे. मार्च – एप्रिल दरम्यान मुलभूत खाद्यान्नामध्ये २५ % नी वाढ झाली आहे. चलनवाढ आटोक्यात आणण्यासाठी आर्थिक उपाय योजना करणे गरजेचे आहे, पण अश्यात माडूरो यांनी अधिक चलन छापून ते बाजारात आणले. त्याचा परिणाम असा झाला कि नवीन पैसा बाजारात आल्याने अजून चलनवाढ झाली आणि अगदी टोकापर्यंत पोहोचली.

सुपर मार्केट मध्ये अन्न नाही, लोक रेशनचे अन्नधान्य मिळवण्यासाठी रात्र रात्र रांगेत थांबलेले, त्यातच बाहेर अन्नसाठ्यांचा काळा बाजार चालू, अन्नावरून लोकांमध्ये मारामा-या आणि दंगली आणि पोलिसांची मग धावपळ, असे भीषण चित्र आज व्हेनेज़ुएलातल्या प्रत्येक शहरामध्ये पाहायला मिळत आहे. जो श्रीमंत आहे तो अमेरिकेतून अन्नधान्य ऑनलाईन   मागवतो, जो मध्यमवर्गीय आहे तो दोन वेळेऐवजी एकदाच खातो, आणि गरीबाची अवस्था तर अत्यंत दयनीय, त्यांना एकवेळा खायला मिळाले तरी पण बेहद्दर. एकूण प्राप्त परिस्थिती बघून निष्कर्ष काढण्यास जागा आहे कि हे सगळे दिखाऊ समाजवादाचे किंवा चुकीच्या सामाजिक धोरणांचे परिणाम ! अजून काय?

खाजगी उत्पादनांवर बंदी आणल्यानंतर मका आणि तांदळासारखे धान्य, जे देशात पिकवले जायचे, ते आता आयात करण्याची परिस्थिती या देशात उद्भवली आहे. तेलांच्या उतरत्या किमतींमुळे जे परकीय उत्पन्न जमा व्हायचे ते आता तसे जमा होत नाही, आयात वाढली आहे आणि उरलेल्या खाजगी कंपन्या बंद होत आहेत, कारण त्यांच दिवाळं निघालेल आहे. लुफ्तानसा, लॅटअॅम आणि एरोमेक्सिको सारख्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी आपली नियोजित सर्व उड्डाणे स्थगित केली अथवा बंद केली आहेत. माडूरो सरकार याउलट देशातल्या आर्थिक संकटांच खापर अमेरिकादी देशांवर फोडते आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार परकीय लोक आणि खाजगी उद्योगपतींनी अन्नाची मोठ्या प्रमाणावर साठेबाजी केली आहे, त्याचा हा परिणाम आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेनुसार व्हेनेझुएलात जगातील सर्वात वाईट म्हणजे -८% नकारात्मक विकास दर आहे, तसेच बेरोजगारीचा दर १७% आहे कि जो भविष्यात ३०% पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

या सगळ्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यास लक्षात येईल कि आता व्हेनेझुएलाकडे खूप कमी पर्याय शिल्लक राहतात, एक तर आयात बंद करणे, नाही तर दिवाळं घोषित करणे! पण या दोन्हींपैकी कुठलाच पर्याय प्रत्यक्ष्यात शक्य नाही. यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांनी ताबडतोब मोठे बेलआउट पॅकेज ठराविक काळापर्यंत मंजूर करून, सामान्य जनतेला दिलासा दिला पाहिजे, तसेच अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी मदत करून आधी अन्न धान्याचा दुष्काळ कसा संपेल यासाठी तातडीची मदत केली पाहिजे. यात अमेरिकेचा स्वार्थ म्हणजे अमेरिकेला आता या देशाबरोबर संबंध सुधरवण्यासाठीची संधी चालून आली आहे. अमेरिकेने याप्रसंगी औदार्य दाखवून या लॅटिन अमेरिकन राष्ट्राला मदत करणे गरजेचे आहे. क्युबा बरोबर संबंध पूर्ववत केल्यानंतर अमेरिका व्हेनेझुएलाबरोबर संबंध नीट करते का ते बघणे औत्सुक्याचे ठरेल. पण या निमित्ताने अर्थव्यवस्था चालवण्यासाठी योग्य पर्याय काय समाजवाद कि भांडवलवाद? हे धोरण आता सामान्य जनतेलाच ठरवावे लागेल, कारण शेवटी जनता ही सरकारपेक्षा श्रेष्ठच आहे !

- निखील कासखेडीकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आधुनिक व्यापारातील संकल्पना -

  मुक्त व्यापार. व्यापारातील संरक्षणाच्या पद्धतीच्या बरोबर विरुद्ध प्रकार म्हणजे मुक्त व्यापार. आणि हो आज मुक्त व्यापाराचा सगळीकडे बोलबाला आहे. अनेक अभ्यासक, अर्थतज्ञ, राजकीय विश्लेषक तसेच अनेक तज्ञ लोकांनी या मुक्त व्यापार संकल्पनेला संमती दर्शवली आहे. या मुक्त व्यापार संकल्पनेचा अनेकांनी उहापोह केला आहे, आणि सगळ्याचं एकमत असं झालं कि हीच व्यापार पद्धती सर्वसमावेशक आणि सर्व देशांच्या हिताची आहे. एवढच काय तर जागतिक व्यापार संघटना या मुक्त व्यापार संकल्पनेला बांधील आहे. त्यांच्या अजेन्ड्यामध्ये दोन किंवा अधिक देशांचा एकमेकांशी मुक्त व्यापार ह्या मुद्द्याचा परामर्श घेतला आहे. एक गोष्ट मान्य करायला पाहिजे कि आज जगात मुक्त व्यापारचे समर्थक मोठ्या संखेने आहेत, त्याच्या तुलनेत व्यापाराला संरक्षण द्या असे म्हणणारे खूप कमी आहेत. खरं असं म्हणायला काहीच हरकत नाही कि मुक्त व्यापारावर सगळ्याचं एकमत आहे. मुक्त व्यापाराची काही खास अशी वैशिष्टे आहेत. व्यापारातील संरक्षण या संकल्पनेत ज्या काही गोष्टींचा अंतर्भाव केला आहे अगदी त्याच्या सगळ्या उलट गोष्टींचा स्वीकार मुक्त व्यापारात केला आहे. उदाह...

अमेरिकेत जवळपास ५० वर्षानंतर झाली UFO संदर्भात बैठक!

  अमेरिकेमध्ये बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडत असतात... म्हणजे हेच उदाहरण घ्यायचं झाल्यास पेंटयागॉन या अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मुख्यालयात एक महत्वाची आणि तितकीच रंजक बैठक पार पडली. विषय होता UFO ... म्हणजे थोडक्यात आकाशात दिसणाऱ्या आणि उडणाऱ्या रहस्यमय वस्तु! अश्या वस्तु ज्याचं मूळ बाहेरचं आहे असं समजलं जातं आणि ज्या पृथ्वीच्या बाहेरच्या कक्षेत फिरत असतात असं आपण म्हणू शकतो. खरं तर हा खूप अभ्यासाचा विषय आहे आणि पाश्चिमात्य देशांमध्ये यावर संशोधन सुरू असतं. अमेरिकन कॉँग्रेस समोर डिफेन्स अंडरसेक्रेटरी रोनाल्ड मालट्राय आणि नेव्हल इंटेलिजेनसचे डेप्युटी डिरेक्टर स्कॉट ब्रे हे या चौकशीला सामोरे गेले. अश्या विषयावर ५० वर्षानंतर पहिल्यांदाच ही अनोखी पण अधिकृत बैठक पार पडली. या UFO प्रकरणाला नाव दिल गेलं UAP , म्हणजे अनआयडेंटिफाईड एरियल फेनोमेना! या संदर्भात ११ महीने आधी यावर एक अधिकृत अहवाल या दोघानी सादर केला आणि त्यानंतर ते या इंटेलिजन्स कमिटीसमोर हजर राहिले. मालट्राय आणि ब्रे यांनी अहवाल देताना २००४ पासून आजपर्यन्त जवळपास १४० अश्या केसेसचा हवाला दिला. अमेरिकन सैन्य दलांच्या पायलटसन...

फार्क (FARC) रुपी तलवार म्यान !

कोलंबिया म्हणजे जगविख्यात लेखक नोबेल विजेते गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझ यांची भूमी! जशी ही थोर साहित्यिकांची, लेखकांची भूमी तशीच ही Farc (रिव्हॉलुशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया) या डाव्या क्रांतिकारी संघटनेची पण आद्य भूमी. या क्रांतिकारी गटाचं वैशिष्ट्य म्हणजे हा गट काही डाव्या क्रांतिकारी विचारवंतांचा गट नाही. स्थापनेपासूनच या गटात विचारवंत नाही तर सामान्य गरीब शेतकरी सामील झालेले होते. या गटाची निर्मिती साम्राज्यवादाला विरोध आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागाचे महत्व आणि वर्चस्व मान्य असणे या दोन मुलभूत घटकांवर झाली. साधारणतः अनेक डाव्या क्रांतिकारी चळवळी आणि गटांप्रामाणे या Farc चाही भर स्वतःची सैनिकी फौज असण्यामध्ये होता. १९६४ पासून हा गट कार्यरत झाला. पण दुर्भाग्य म्हणजे या गटाची मदार ही अपहरण करणे आणि खंडणी मिळवणे तसेच ड्रग्सचे स्मगलिंग करणे यांवर होती. पण नुकत्याच कोलंबियन सरकार आणि Farc नेत्यांमध्ये झालेल्या करारामुळे साधारणतः ५० वर्षे चाललेला सत्तासंघर्ष संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. असे म्हणण्याचे कारण म्हणजे अजून सार्वमत घेऊन ह्या कराराला अंतिम मान्यता मिळणे बाकी आह...